Wednesday, 3 February 2021

४५ वर्ष - ४५ भेटवस्तू ४६ व्या वर्षात पदार्पण

 ४५ वर्ष - ४५ भेटवस्तू  ४६ व्या वर्षात पदार्पण! 


वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक वर्ष कमी झालं वगैरे विचारांची मी नाही. अजून एक वर्ष आपल्याला मिळालं आहे ते आनंदाने जगायचं आणि साजरं करायचं अस वाटत आणि त्यामुळे मला माझाच काय सगळ्यांचे वाढदिवस साजरे करायला आवडतात. Surprise देणं हे तर आधिक आवडत. त्यामुळे कधी न कधी वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा असंच माझ्याकडून surprise हे कोणाला न कोणाला दिल जातं. मग तसंच माझ्या बाबतीत झालं नाही तर नवल ते काय! 


आणि असंच झालं यावर्षी. यावर्षीचा वाढदिवस माझा संपूर्ण सर्प्राइजेसने साजरा झाला. त्याची सुरुवात झाली ती मागील शुक्रवारपासून! वर्षभरानंतर ठाण्याला शुक्रवारी जाऊन ठाण्यातून आई ला फोन करून सरप्राईज पहिलं आई बाबांना अभि, मुग्धा ला दिलं पण ते माझ्या चार पाऊले पुढंचेच ठरले. 


यावेळी पुण्यातून निघतानाच प्रायोरिटी वरती आई बाबा मुग्धा, टिकेकर काकू आणि सटकर मावशी आणि काकांना भेटायचं ठरवलं होत. शनिवारी सकाळी टिकेकर काकू आणि सटकर कुटुंबियांना भेटून झालं होत  त्यामुळे दुपारी जेवणानंतर मी मस्त ताणून दिली. माझी उठण्याची काही लक्षण नाही म्हणून शेवटी आईने उठवले. त्यानंतर अर्थात चहा आणि गप्पांचे सेशन सुरु झाले. थोड्या वेळाने आई अगदी जरी काठी साडी नेसून तयार झाली. मी अगदी घरच्या अवतारातच होते. तिला विचारलं कि का ग इतकी तयार झाली तर म्हणाली आज आपण सगळे वर्षाने भेटत आहोत एकत्र जेवणार म्हणून. तू अशी बोहारणी सारखी बसू नको जा आवार" यादरम्यान अभि ने जेवण ऑर्डर केल. मी पण तयार होऊन बाहेर बसले. गप्पा अखंड चालू होत्याच मग आलेल्या जेवणाचा फन्ना उडवला. आणि परत गप्पा सुरु! 


पाच दहा मिनिटाने आई निरांजनाच ताट घेऊन आली. क्षणभर काय सुरु झालं समजलं नाही म्हटलं अग आत्ता काय? तर म्हणाली तू आता इथे बस आणि ओवाळते तर ओवाळून घे. आईने औक्षण केलं मग मुग्धाने पण औक्षण केल. दोन मिनिटाने आई बाबा सारी बॅग घेऊन आले आणि माझ्या हातात दिली. एकीकडे अभि आणि मुग्धाने दुपारीच येताना केक आणला होता तो आणून पुढ्यात ठेवला. म्हटलं अग २६ जानेवारी ला अजून  २ दिवस आहेत. तर म्हणाली मला ४५ वर्ष तुझी पूर्ण व्हायच्या आधी करायचा होता! मग म्हणाली आता सारी बॅग उघड. माझी उत्सुकता अजूनच चाळवली गेली. सारी बॅग उघडून पाहते तर काय! वेगवेगळ्या काही माझ्या आवडीच्या वस्तू काही उपयोगी अशा त्यात होत्या. त्यात पार्ले G चा पुडा हा तिने आवर्जून ठेवला होता. ❤️

मग माझ्या भाची बरोबर केक कटिंग पार पडले. आणि सर्वांनी केक मनसोक्त खाल्ला. 


अशा तऱ्हेने मी आई ला सरप्राईज दिल त्यापेक्षा भारी सरप्राईज मला आई बाबा अभि मुग्धा ने दिलं. आईने मला ४५ वर्षे पूर्ण होणार म्हणून ४५ वस्तू देऊन माझा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे माझी ठाण्याची ट्रिप फार कमी कालावधीची असली तरी संस्मरणीय झाली. या सर्वांना थँक यु म्हणणं योग्य ठरणार नाही पण इतकं नक्कीच म्हणेन कि आई, बाबा, अभि, मुग्धा, टिम्मी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि तुम्हाला चांगले आरोग्य लाभो. 

लव्ह यु. 🤗❤️


सौ स्वप्ना शेंडे भिडे 

३१ जानेवारी २०२१


वाढदिवस भाग १

Thursday, 30 January 2020

मायेची ऊब.

मायेची ऊब

कितीही काही झालं तरी जगात एक व्यक्ती अशी प्रत्त्येकाच्याच आयुष्यात असते जी जवळ नसली तरी तिची आठवण नक्कीच सोबत असते. इतकच काय तर आपल्याला अगदी लागलं तरी पहिला शब्द येतो तो आई ग !

तर अशा अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तीचा म्हणजेच माझ्या आई चा काल वाढदिवस होता.. कितीही मतमतांतरे झाली, वाद झाले, कामे न करण्यावरून,फोनवर गप्पा मारण्यावरून घरी वेळेत न आल्यामुळे तिचा ओरडा खाल्ला तरी हिच्याशिवाय पान हलत नाही. लहान असताना मी माझ्या आजीकडे म्हणजे आईच्या आई कडेच जास्त असल्याने आणि आईच्या नोकरीमुळे खुप लहान असतानाच्या तिच्याबरोबरच्या आठवणी आठवत नाही. पण, तिने माझ्यासाठी केलेले लाड मग ते विविध फॅशनचे कपडे असोत किंवा तिच्या हातचा केक असो. ड्रेस वर मॅचिंग हेअरबॅण्ड असो, पिना असो किंवा अगदी आशिकी नावाचा चित्रपट खुप गाजला होता तेंव्हा त्यातील केसांना बांधायचे फॅन्सी बो या सर्व गोष्टी ती अगदी हौसेने आणायची आणि माझे लाड करायची हे सर्व अजूनही लक्षात आहे.

तिच्या खास दिवशी काही आठवणी सांगाव्याशा वाटल्या म्हणून हि पोस्ट!

आईच्या हातचे काही पदार्थ असे आहेत की ते तीनेच करावेत आणि आपण मनसोक्त खावेत. त्यापैकी एक म्हणजे केक. पूर्वी ओवनवगैरे तर नव्हताच पण तव्यावर वाळु ठेवून त्यावर रिंगच्या आकाराचा केक होईल अशा भांड्यात तयार केलेला केक म्हणजे माझ्यासाठी ती ट्रीट असायची आणि तेंव्हा माझा भाऊ अभिषेक देखील नसल्याने शेअरिंगचा प्रश्नच नसायचा. त्यामुळे केक मस्त ताव मारून खायचे मी! आई ला अंड्याचा वास देखील सहन होत नाही तरी ती प्रेमाने तो केक तयार करायची. मग कधी त्यात टुटीफ्रूटी, तर कधी बडिशेपच्या रंगीत गोळ्या तर कधी जेम्सच्या गोळ्या लावून सजावट असायची. या तीनपैकी एक केक म्हणजे एकदम खास काहीतरी असेल तरच असायचा. ती केक तयार करत असताना मला पण काहीतरी मदत करायची म्हणून माझी लुडबुड हि असायची. केकचे मिश्रण एकदा मोल्ड मधे भरले आणि त्याची रवानगी तव्यावर झाली की केक तयार झाल्याचा एक खमंग वास येईपर्यंत मी शेगडीच्या बाजुलाच बसलेली असायचे. एकदा असच केक करायची माझी भुणभुण ऐकून तिने सकाळी ऑफिस ला जायच्या आधी आज घरी आले की केक तयार करेन असं सांगितलं. शाळेतून आल्यावर कधी एकदा आई येते या विचारात तिची खिडकीत बसून वाट पाहणे चालू होतं. ती घरी आल्यावर लगेचच केकसाठीच आणलेल सामन तिच्याकडून घेऊन ओटयावर ठेवत मी कधी केक तयार होईल?  विचारलं. "तू खेळायला जा तिथुन येईपर्यंत केक होईल तयार!" असं मला सांगून ती तिच्या कामांना लागली आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला पळाले. आम्ही रोज सर्व खेळून, थोड्या वेळ गप्पा मारून घरी जायचो. त्या दिवशी आई केक करणार याचा इतका आनंद झाला होता की गप्पा मारताना मित्रमैत्रिणींना ओघात आई केक करत आहे हे सांगितलं आणि पटकन कोणीतरी "आम्ही येऊ का खायला?" विचारलं. हो तुम्ही सगळे या असं मी सांगितलं. मग काय सगळेच खुष! घरी सगळे जायच्या आधी सगळ्यांना घेऊन मी आमच्या घरात हजर आणि आईला सांगितलं आई सगळ्यांना केक खायला मी घरी घेऊन आले. आईने मस्त सर्वांना वाटीत गरम गरम केकचे छान तुकडे करून खायला दिले. बघता बघता केक अर्ध्यापेक्षा जास्त संपला. केक चे कौतुक करत मुलं आपापल्या घरी गेली पण मी मात्र वाटी हातात घेऊन आई अजुन केक? असं विचारलं. आई म्हणाली आता मला आणि बाबांना एक तुकडा एवढाच उरला आहे. "अग असा कसा संपला म्हणून मी जरा तोंड वाकडच केलं." आईने परत लवकरच करेन असं म्हणून माझी समजूत घातली आणि परत दुसऱ्या दिवशी केक तयार केला देखील! हा प्रसंग आम्ही अजूनही आठवून हसतो.

तशीच एक लक्षात राहिल अशी गोष्ट म्हणजे, आईकडे अनेक कलागुण आहेत किंवा ती तिचे अनेक छंद जोपासते त्यातील एक म्हणजे विणकाम. आईने आजपर्यंत अनेकांना स्वेटर पायमोजे, बाळंतविडयावर देण्यासाठी स्वेटरचे सेट विणुन दिले आहेत. मीदेखील कायम तिने विणलेले स्वेटर, जॅकेट्स घातले आहेत. मी लहान असताना एकदा ती अशीच कोणासाठी तरी स्वेटर विणत होती. माझ्याकडे लहानपणी जी बाहुली होती तिच्याशिवाय माझं पान हलायचं नाही. त्या दिवशी आईला विणकाम करताना पाहुन मी आईकडे हट्ट सुरु केला. कि सगळ्यांसाठी स्वेटर विणत असते माझ्या बाहुलीसाठी पण विण. आधी मी उगाच काहीतरी हट्ट करते असं आईला वाटलं पण नंतर एकंदरीत माझा त्यासाठीचा पाठपुरावा पाहुन तिने माझ्या बाहुलीसाठी जांभळा आणि पांढऱ्या रंगाचा छान स्वेटर विणुन दिला. हि झाली लहानपणीची आठवण. पण आईने विणलेला स्वेटर हवा हा हट्ट माझ्या या वयात पण कायम राहिला.  काही महिन्यांपूर्वी कोणासाठी स्वेटर विणताना पाहुन परत मला पण स्वेटर विण हा हट्ट मी माझ्या वयाच्या 43व्या वर्षी केला आणि माझ्या आईने तिच्या 68व्या वर्षी देखील तेव्हढ्याच उत्साहाने पूर्ण केला. शेवटी हिच ऊब आयुष्यभर आपल्यासोबत राहते.

काल तिचा वाढदिवस होता तिला सरप्राईज द्यायच अचानक ठरवलं आणि तिला भेटायला ठाण्याला यायला निघाले पण या सर्व गडबडीत तिने विणलेल्या स्वेटर चा फोटो क्लिक करायचा राहिला. पण, मला रात्री अचानक दरवाज्यात पाहुन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन आणि तिच्या तोंडून माझ्यासाठीची अग बये, बघ कशी दुष्ट आहेस सकाळी फोन वर विचारलं तेंव्हा पण असा काय विचारतेस? मधल्या वारी शाळा, बाकी रूटीन चालू असताना कशी येईन! हि माझीच वाक्य थोडं चिडवुन, वेडावुन म्हणून दाखवली. ते पाहताना जाम मज्जा वाटली आणि आम्ही खुप हसलो.

साडी आणि चितळे यांच्याकडील अंजीर रोल तिला भेट दिली. हे क्षण जगताना मनाला वेगळच समाधान मिळत होतं. असं प्रेम अशी ऊब कायम आम्हाला मिळो आणि त्यासाठी आईला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच 33 कोटी देवांकडे तिच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा प्रार्थना... 🙏🏻🙏🏻🙏🏻

वाढत्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!!🎂🍰🍫💐



©️स्वप्ना शेंडे भिडे.

Tuesday, 27 August 2019

दाद

दाद.

प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या कलेची आवड असते. काळानुरूप किंवा काम, करियर, संसार या सर्व गोष्टीत ती जोपासली जातेच असं नाही. पण अशीही काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात जी कला जिवंत ठेवण्यासाठी किंवा स्वतःला नुसती आवड आहे म्हणून दुसऱ्यांना कायम प्रोत्साहन देतात.

केदार आणि माझी ओळख 2 वर्षांपूर्वीची, ती देखील आमच्या सवाई गंधर्व चा ग्रुप आहे त्यात तो सामिल झाल्यामुळे झालेली. हा पेशाने वकिल असला तरी संगीताची आवड. कोर्टामधे भले न्यायाधीशसमोर मोठ मोठ्याने हा आपल्या अशिलाची बाजु मांडत असेलही पण ग्रुप मधे तसा शांतच म्हणून ओळखला जातो. नाटकाची आवड म्हणजे परफॉर्म करण्याची हौस आहे हे याच वर्षी समजल.

ओळख जितकी जुनी होत जाते तसतस आपण माणसांना जास्त ओळखू लागतो त्याचप्रमाणे त्याच्या काही स्वभावांचे पैलुही हळूहळू कळायला लागतात. केदार तू मनाने पण तितकाच मोठा असशील हे मागील आठवड्यात आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ वरुन पक्क झालं.

झालं असं की केदार पनवेलचा. तालुका पोलिस स्टेशनच्या बाजूला एक चांभारवाला बसतो ज्याला बासरी वाजवताना त्याने ऐकला होत आणि त्याने स्वतः पण थांबून ऐकल होतं त्याचं बासरी वादन पण चप्पल दुरुस्तीचा योग कधी आला नव्हता, जो मागील आठवड्यात आला. मग काय केदार वकिल सोडतोय का चांभाराला!!! केसच्या जशा तारीख पे तारीख पडत जातात त्याप्रमाणेच केदार ने त्या चांभाराला य प्रश्न विचारले.

अत्यंत साध्या कुटुंबातील, बायका पोरांची जबाबदारी असणारा चांभार अंदाजे दिवसाला चप्पल शिवुन 400/- कमावत असेल. पण बासरीची मनापासून आवड असल्याने केदारने बासरीचा विषय काढल्यावर चेहरा त्याचा खुलला आणि तो त्याविषयी बोलू लागला. त्याने केदार ला "पंख होते तो उड आती रे' हे गाणं देखील वाजवून दाखवले. चांभार वाजवत असलेली बासरी ही उन्हामुळे आणि आताच्या दमट हवेमुळे थोड़ी वाकडी झाली होती पण तरीही त्यातून तो फार सुरेल सुर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता जेंव्हा काही ठिकाणी ते योग्य लागत नव्हते तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरील खंत स्पष्ट केदारला दिसत होती.

इतकं सुंदर वाजवतोस तर छान शिकत का नाही? असा प्रश्न केदारन विचारला खरा पण, त्यावर, " साहेब जेमतेम पोटापुरते पैसे मिळतात, त्यात हे लाड कुठून करायचे?!!!" अस उत्तरुन त्याने वास्तवतेची जाणीव करून दिली. ते ऐकून केदार घरी यायला निघाला पण त्याच्या डोळ्यासमोर त्या चांभाराचा चेहरा आणि त्याचं शेवटच वाक्य मनात घर करून राहिलं. त्याच मनस्थितीत माझ्यामते हा अनुभव त्याने आमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर लिहून पोस्ट केला. आणि पुढे लिहिल की त्या चांभारला मी बासरी घेऊन देणार. त्याने लिहिलेल्या या अनुभवाच आम्ही सर्वांनीच कौतुक केलं. पण मला असही वाटलं की हा इतका त्याच्याच रूटीन मधे व्यग्र असतो कधी बरं हा त्या चांभारासाठी बासरी आणेल. पण त्याने त्याचं बोलण खरं करून दाखवलं. गोकुळअष्टमी सारखा छान दिवस गाठून त्याने त्या चांभाराला बासरी विकत घेऊन त्याकडे सुपूर्त केली.

इतकच नाही तर त्याच्या पोस्ट वर मी तेंव्हा लिहिलं होतं की जेंव्हा त्याला बासरी देशील तेंव्हा त्याला ती वाजवायला सांग आणि त्याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड कर. आणि केदार ने तसं केलही. त्याच्या या उत्साहाला सलाम!!! आणि एखाद्याच्या अंगी असलेल्या कलेला अशा प्रकारे दाद देण्याची कल्पना खुप आवडली. त्याचा हा उत्साह पाहून माझी मैत्रिण अश्विनी हिनेही मी काहीतरी यावर लिहावं असं सुचवल.

मग काय असा कलाकार आणि दाद देणारे असे हे माझे मित्र मैत्रिण यांच्या कौतुकासाठी माझी हि पोस्ट - दाद!!!

©️स्वप्ना शेंडे भिडे.
२७ ऑगस्ट २०१९


Monday, 29 July 2019

Smile Please!!!

रिपोर्ट्सच्या फाइलकडे पाहून हि माझी ओळख नसणारे तर माझं काम माझी ओळख असणार आहे... किंवा जोपर्यंत लक्षात आहे तोपर्यंत विचार... असे संवाद आणि त्याबरोबर तितक्याच सहजतने आणि ताकदीने आपली भूमिका वठविताना मोठ्या पडद्यावर दिसणारी नंदिनी, नंदू म्हणजेच मुक्ता बर्व परत एकदा मनात घर करून गेली.

गोष्ट एक नामांकित फोटोग्राफर, जिला आयुष्यात आपल्याला काय हवे आहे, काय करायचं आहे हे खुप स्पष्ट आहे. धडाडीची, महत्वाकांक्षी आणि स्वतःच्या क्षेत्रात नावलौकिक असलेली नंदिनी हिला मोठ्या पडद्यावर पाहताना हि तर आपल्यातीलच एक आहे आणि असं काही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं अगदी माझ्याही!!! असं नक्कीच मनात येऊन जातं.

दैनंदिन जीवनातील गोष्टी अगदी सहज करणारी नंदिनी काही साध्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी विसरते. हि गोष्ट ती तिच्या कॉलेजपासून ओळखत असणाऱ्या डॉक्टर मैत्रीणीला सांगते. तिच्या सांगण्यावरून नंदिनीच्या वैद्यकीय चाचण्या होतात आणि त्यातून जे समजतं तेव्हापासून ते चित्रपट संपेपर्यंत पडद्यावर दिसणारी नंदिनी हि आपलीच कोणीतरी एक असावी असं वाटत.

ज्यावर काही औषध नाही असा आजार आपल्याला झाला आहे हे वडिलांपासून लपवणारी आणि नंतर
ऑफिसचे कागद शोधताना रिपोर्ट्सची फाईल वडिलांना मिळाल्यावर त्यांना घट्ट बिलगणारी नंदिनी...
आपल्याला डिमेंशिया कसा काय होऊ शकतो आणि तो झाला आहे हे आधी नाकरणारी पण असेल झाला तरी मी माझं आयुष्य तितक्याच आनंदनं जगणार असं आपल्यापासून विभक्त झालेल्या नवऱ्याला सांगणारी नंदिनी...
कालांतराने हा आजार जास्तच बळावल्यानंतर वयात येणाऱ्या आपल्या मुलीला एकच प्रश्न अनेकदा विचारणारी आणि त्यामुळे चिडलेल्या आपल्या मुलीशी तितकीच शांतपणे बोलणारी नंदिनी...
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हरवलेली, आवाज, गोंगाट सहन न होणारी, रस्ता विसरलेली नंदिनी, जिला विराज नावाचा युवक जो त्यांच्याकडेच काही दिवसांसाठी राहायला आलेल्या या पाहुण्याचे एका क्षणी आभार मानणारी आणि दुसऱ्याच क्षणी हा कोण इथे कशाला आला असं म्हणणारी नंदिनी ...
या आणि अशा अनेक दृश्यांमधून आपल्या आजारविषयी राग, तर कधी त्यामुळे आलेली निराशा, हतबलता... तसचं मूळ महत्वाकांक्षी स्वभाव असणारी आणि धडाडीने तितक्याच जोमाने स्वतःला यातून बाहेर काढण्यासाठी झगडणारी नंदिनी हि मुक्ताने अत्यंत ताकदीने साकराली आहे.

बायकोपासून विभक्त झालेला, आणि आपली मुलगी नूपुर च्या वडिलांची भूमिका साकरणारा प्रसाद ओक याने काही प्रसंगातुन डोकवणारा पुरुषी अहंकार, पण विभक्त झाला असला तरी नंदिनी विषयी काळजी करणारा आणि घेणारा नवरा, तसच मुलीवर कधी प्रेम तर वेळप्रसंगी तिला दटावणारा एक बाप खुप छान रंगविला आहे.

आपली आई ही आई नसून शत्रुच आहे. जीने आपल्यापेक्षा आपल्या करियर ला महत्व देऊन आपल्याकडे दुर्लक्ष केलं ही मानसिकता घेऊन वयात आलेली नूपुर, तिच्या सहवासासाठी आतुर असलेली नंदिनी आणि त्या दोघींमधील काळानुरूप वाढत चाललेली दरी हि अनेक प्रसंगातुन दिसून येते. नूपुर ची भूमिका साकरलेली वेदश्री महाजन हिने वयात येणाऱ्या मुलीचे मूड, राग, आईवडिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, त्या पूर्ण होण्यासाठी केलेला हट्ट, प्रसंगी आईचा किंवा बाबांचा रागराग आणि आईचा न बरा होणारा आजार समजल्यावर हीच काय ती वेळ आहे तिला समजून घेण्याची असं सांगणाऱ्या विराजच्या बोलण्यावर आधी फारसा विचार न करणारी आणि नंतर परिस्थिति समजून आईची काळजी आणि तिला परत उभ करण्यासाठी विराज ला साथ देणारी नूपुर आवडली.

सतीश आळेकर यांनी नंदिनीच्या वडिलांची भूमिका मस्त निभावलीच पण बरोबरीने एक आजोबा, सासरा, मित्र अशा छटा छान रंगवल्या.

मूळचा नागपुरकर पण कामानिमित्त प्रथमच मुंबईत आलेला आणि कोणीच ओळखीचे मुंबईत नसल्याने काही दिवस पाहुणा म्हणून नंदिनीच्या वडिलांच्या घरी  राहायला आलेला विराज म्हणजेच ललित प्रभाकर. लहानपणीच आईवडिलांची छत्रछाया गमावल्यामुळे त्यांच्या प्रेमापासून वंचित राहिलेला विराज हा नंदिनीसाठी देवदूतच ठरतो. नंदिनीच्या
आजाराविषयी समजल्यावर, फारशा आशा न उरलेल्या आणि प्रत्त्येक दिवस एक नविन आव्हान म्हणून पेलणाऱ्या नंदिनीची, स्वतःच वेगळेपण जपणाऱ्या नंदिनीशी तो नव्याने ओळख करून देतो. हे सर्व करत असताना त्याने निखळ मैत्री असणारी मित्राची भूमिका इतकी छान केली आहे की कोणालाही अगदी सहज वाटेल की आपला असा एखादा मित्र नक्कीच असावा.

अदिती गोवित्रीकर ने डॉक्टर मैत्रीणिची भूमिका हि चांगली निभावली आहे. मूलतः मॉडेल म्हणून नावरूपास आलेली अदितीचा अभिनय असलेला मी पहिलेला पहिलाच चित्रपट, त्यामुळे अभिनय चांगला बरा हे मी ठरवणं योग्य नाही.

विक्रम फडणीस हा उत्तम फॅशन डिझायनर तर आहेच पण त्याने स्माइल प्लीज या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाद्वारे  अगदी सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा खुप छान प्रयत्न केला आहे. एक मात्र निश्चित की चित्रपटात डिमेंशिया या आजाराचा धागा घेऊन हा आजार झाल्यावर रुग्णाची होणारी अवस्था आणि त्यामुळे त्याच्या आप्तेष्टांचे रुग्णासोबत जग बदलते आणि अशावेळी त्याच्याभोवती त्याला समजून घेणारी माणसं मग ते नातेवाईक किंवा एखादा छानसा मित्र किंवा मैत्रिण असे सर्व असेल तर रुग्णाच जगण थोडं सुकर होऊन आयुष्य जगण्याची उर्मी त्याच्यात नक्कीच निर्माण होऊ शकते. त्याच बरोबरीने हा आजार बरा होणारा नाही हे जितकं सत्य आहे तितकच या आजाराविषयी जास्तीत जास्त जाणून घेऊन, त्या रुग्णाविषयी कोणतेही गैरसमज न करता किंवा ते न पसरवता योग्य तो मदतीचा हात दिला तर त्या माणसाचं उर्वरित आयुष्य थोडं तरी सुसह्य करू शकतो असा संदेश छान पोहोचवला आहे.

थोडक्यात काय चेहऱ्यावर एक छोटीशी हास्याची रेष समोरच्याच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणु शकते हे निश्चित...!!! आणि म्हणूनच
Smile Please!!! 😊

©️स्वप्ना शेंडे भिडे.
https://muktashravansari.blogspot.com



Monday, 27 May 2019

आई, कॉफी आणि मी... 🙂
बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. तसं म्हटलं तर ठाण्याला येणं हे अधून मधून होतंच असत. येण्याची वर्दी आधीच दिली असली कि भेटीगाठीचे कार्यक्रम आणि कामांची यादी पण तशी तयारच असते. पण यावेळी जरा बदल केला.
शनिवारी निघून रविवारी पुण्यात परत जाणारी मी रविवारी उशिरा इथे आले. पुण्याहून निघतानाच सगळं ठरलेल असतं पण यावेळी नक्की असं काहीच ठरवलं नव्हतं. नक्की इतकच होत कि गौरांगला घेऊन परत पुण्यात यायच.
एरवी कॉफीचे नेहेमीच्या अड्ड्यावर भेटण्याचे किंवा एकत्र आपल्या मित्रमैत्रिणी किंवा घरच्यांसोबत जेवायला बाहेर जायचे कार्यक्रम घडवून आणण्यास उत्सुक असणाऱ्या मला या खेपेस अजिबात उत्साह नव्हता. त्यामुळे आजचा दिवस आई बाबांसोबत आणि माझं फेसबुकच काम करण्यात घालवला.
संध्याकाळी आईसोबत एक चक्कर मारायला जायच ठरवून मी बाहेर पडले. ती आधीच तिच्या संस्कार भारतीच्या कामासाठी बाहेर गेली होती त्यामुळे तिला गोखले रोडवर एका ठिकाणी भेटायचं ठरलं.
सोमवार असल्याने दुकाने शक्यतो बंद आणि त्या दिवशी बंद दुकानांच्या बाहेर कपडे, पर्सेस, टीशर्ट्स वगैरेची दुकानं थाटलेली असतात त्यामुळे खरेदी नाही केली तरी चालत एक छान फेरी मारून होईल हा विचार मनात धरून मी आणि आईने चालायला सुरुवात केली. गोखले रोड म्हणजे पायाखालचा रस्ता त्यामुळे कुठे पोहोचल्यावर कोणत्या पदार्थांचे वास येणार हे माहित होतं. उन्हाळ्यामुळे माझी आणि आईची स्थिती सारखीच होती. त्यातच तिला रात्री जेवायला काय करू याची भ्रांत होतीच. पण तिला कंटाळा देखील आला होता. तिने काहीतरी चटपटीत खायचं का? विचारल्यावर मी चालतंय कि म्हटलं 🙂 पण मग त खायचं तर काय खायचं यावर चर्चा. तिने गोखले उपहार गृह, अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र अशी नवे घेतल्यावर मी अत्यंत आंबट चेहेरा करून त्यापेक्षा घरीच जेवू म्हटल. शेवटी हो नाही करत तिच्याच आवडीच्या हॉटेल मध्ये "सुरज" राम मारुती रोडला आहे तिथे जायचं ठरलं.
एसी मध्ये बसून मनसोक्त तिने शेजवान स्प्रिंग डोसा आणि मी चीज ओनियन उत्तपा यावर ताव मारला. खात असताना ती त्या हॉटेल मध्ये अनेक वेळा आल्यामुळे वेगवेगळ्या आठवणी सांगत होती.मध्येच तिचा फोटो, कॉफीच्या कप्सचा फोटो क्लिक केला. उठसुठ फोटो काढत असते हे तिला माहित असल्याने तिने फारशी फोटो का क्लिक करते हि चौकशी न करता फोटो काढून दिला. तिला कुठे माहित होतं कि मी तिचा फोटो का क्लिक करतेय ते...!!! गप्पांमध्ये असंही तिनं सांगितलं कि सुरजमध्ये कॉफी छान मिळते आणि डोसा/उत्तप्पा खाल्यावर कॉफी नाही म्हणजे नाइन्साफच...!!! म्हणून कॉफी ऑर्डर केली.घरी बाबांसाठी आणि गौरांग साठी त्यांच्या आवडीचे पार्सल घेऊन मस्त गप्पा मारत, परत रमत गमत चालत घरी पोहोचलो.
घरी येताना मनात हाच विचार आला कि इतके वेळा मी येते पण आपण दोघी जाऊया बाहेर कॉफी प्यायला किंवा खायला हे आईने कधीच बोलून दाखवले नाही कायम पूर्ण कुटुंब एकत्र जाऊ असं म्हणायची. पण आज काहीच न ठरवता जुळून आलेला योग खूप आनंद देऊन गेला.आणि म्हणूनच असं वाटत कि आपल्यासारख CCD, Strabucks,Barista यांसारख्या ठिकाणी कॉफीला तुम्ही का जाता हा प्रश्न आणि त्यावर का जातो हे तिला समजावून सांगण्यापेक्षा एखादवेळी तिच्या आवडीच्या ठिकाणी तिच्यासोबत जाऊन काही तास घालवला तर काय हरकत आहे? कारण जशी आज ती आणि मी एकेमेकीसमोर बसून मस्त गप्पा मारत खात पीत वेळ घालवला. तशी वेळ काही वर्षानंतर माझी पण येईलच कि...!!! फक्त समोरची व्यक्ती बदलली असेल... आणि म्हणतात ना कि कोणाचा वेळ हा पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळे आपण एखाद्याला दिलेला वेळ मग तो समक्ष भेटीत असो किंवा फोनवर बोलून असो यासारखी सुरेख भेट नाही..!!
©️स्वप्ना.
Add caption

Tuesday, 30 October 2018

हिमालयाचे वारकरी वसंत वसंत लिमये...

वसंत वसंत लिमये म्हटलं कि एक ठाणेकर, आयआयटीअन, एक लेखक आणि हाय प्लेस मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा हे समीकरण आहेच पण याचबरोबर अत्यंत दिलखुलास, बेधडक, उत्साही, सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते... कायम समोरील माणसाच्या मनात कुतूहल निर्माण कसं करायचं याचं गुपित समजलेले एक अभ्यासू लेखक म्हणजे वसंत वसंत लिमये...!!!

यांच्या भेटीचा तसं म्हणाल तर योग नोकरीत असताना फारसा आला नाही. पण त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा मात्र नक्कीच होती. अर्थात त्याचे कारण पण त्याच्याच “कॅम्पफायर” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हेच होते ..!!! पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाही असू शकतो याचा प्रत्यय मला तेंव्हा आला. आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली तर किती छान होईल असं वाटत होत.. हि सुप्त इच्छा तेव्हापासुनचीच...!!!

पण म्हणतात ना प्रत्त्येक गोष्टीची एक वेळ असते. माझं तसच झालं... फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं ठरवलं आणि एक दिवस त्यांची वेळ घेतली आणि माझ्या मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. माझं सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर त्यांनी माझ्यापासूनच तू या कामाला सुरुवात कर असं सांगितलं आणि माझ्या नवीन कामाचा श्रीगणेशा झाला. आता या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले. पण या एक वर्षात त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळालं. वक्तशीरपणा, मग तो काम पूर्ण करण्याच्या बाबतीत असो किंवा मिटींगसाठी असो, वेळोवेळी आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा देणे हे असो तो महत्वाचा... सर्वात महत्वाचे म्हणजे कल्पकता...!!! मल्टीटास्किंग कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकावं... कितीही कामाच्या व्यापात असले तरी एसएमएसला त्यांचे उत्तर हे येणारच...!!!

एकीकडे हे सर्व शिकत असताना “विश्वस्त” या पुस्तकाचे विविध कार्यक्रम चालू होते त्यासंबंधित कामे करत असताना एक दिवस अचानक “हिमयात्रा २०१८” या मोहिमेची माहिती त्यांनी मला दिली. त्यासाठीची लागणारी प्रचंड तयारी, मिनिटामिनिटाचे आखलेले वेळापत्रक, त्यासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव, त्यांच्याबरोबर प्रत्त्येक आठवड्यात बदलले जाणारे त्यांचे जे सहकारी होते, त्यांना कुठे, कसे, कधी भेटायचं हे वेळापत्रक, त्याची आखणी हे सर्व पाहून मी थक्क झाले. या २ महिन्याच्या मोहिमेत त्यांच्या “हिमयात्रा २०१८” या फेसबुक पेजवर वेळोवेळी त्यांच्या या मोहिमेचे अपडेट्स छायाचित्राच्या रुपात त्यांच्या चाहत्यांना देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी मला दिली. हे सर्व काम करताना मनात आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलू शकत आहोत याचे समाधान वाटत होते. त्यांची हि हिमयात्रा हि फक्त फिरण्याइतकीच मर्यादित राहणार नाही याचा अंदाज होताच आणि तो बरोबरच होता...!!! कारण, दोन महिन्याच्या मोहिमेनंतर असंख्य कल्पनांसहितच आमची मीटिंग झाली आणि “साद हिमालयाची” या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

“साद हिमालयाची” हा वसंत वसंत लिमये यांच्या “हिमयात्रा २०१८” या मोहिमेचा दृकश्राव्य अनुभव देणारा, तेथील अनुभव आणि वाचक, प्रेक्षक, चाहते मंडळींशी संवाद साधणारा अंदाजे २ तासाचा कार्यक्रम आहे. याचा पहिला कार्यक्रम २३ ऑगस्ट २०१८ रोजी अभ्यास गटा तर्फे ठाकूर धाम येथे झाला. छान गप्पा, प्रश्नोत्तरे झाली. सर्वजण हिमयात्रेत दंगून गेले. हळू हळू अशा कार्यक्रमाविषयी चौकशीचे फोन, ई-मेल, येऊ लागले. अर्थात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य निश्चितच आहे.

दुसरा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०१८ रोजी विष्णूकृपा सभागृहात सरांच्या रुपालीतील मित्रमंडळीनी आयोजित केला होता. यात पुढाकार हेमंत सोमण आणि वर्तक बंधू यांनी घेतला तर वर्षां चाफेकर वर्तक हिने छान मुलाखतवजा गप्पा मारल्या. तिसरा ठाण्यात होणारा कार्यक्रम लगेचच ४ दिवसांनी असल्यामुळे उत्कंठा होतीच.

तिसरा कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सहयोग मंदिर, ठाणे येथे झाला ज्यात वसंत वसंत लिमये आणि . डॉ .आनंद नाडकर्णी असे दोघेही होते. त्यांची मुलाखत मुलाखतकार:- शिरीष अत्रे यांनी घेतली. मुळचे ठाणेकर असल्याने या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉल पूर्ण प्रेक्षकांनी भरला होता. शिरीष अत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उत्तम पद्धतीने दिली. कार्यक्रमाची  रंगत वाढली ती सिक्कीम ते लडाख प्रवासाची क्षणचित्रे आणि त्याला अनुसरून निवेदन असलेल्या छोट्या फिल्मने. थोडक्यात ह्या दृकश्राव्यानुभवातून सर्वांना ‘सिक्कीम ते लडाख’ हा जणू प्रवासच घडला....!!!

चौथा कार्यक्रम १९ ऑक्टोबर २०१८ रोजी 'आदित्य रसिक वाचक गट' तर्फे 'आदित्य गार्डन सिटी' येथे झाला. या कार्यक्रमात वसंत वसंत लिमये सरांसोबत त्यांच्या हिमयात्रेत सहभागी झालेल्या मराठी सीरिअल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम सर्वांच्या लाडक्या “नानी” म्हणजेच सुहिता थत्ते देखील होत्या. त्यांच्यासोबत विश्वेश जिरगाळे यांनी मारलेल्या गप्पा चांगल्याच रंगल्या.

असा गप्पा, प्रश्नोत्तरे आणि ‘सिक्कीम ते लडाख’ ह्या प्रवासाचा अनुभव दृकश्राव्यातून देणारा वसंत वसंत लिमये सरांचा “साद हिमालयाची” हा कार्यक्रम विविध शहरात आणि देशांत होवो या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

Saturday, 4 August 2018

निमित्त "कच्चा लिंबू"चे

स्पेशल आईबाबा निमित्त "कच्चा लिंबू"

प्रत्त्येक आई वडिलांसाठी आपलं मुल हे स्पेशल असतं. त्याला वाढविताना एखादी गोष्ट आपल्याला कमी घेता आली तरी चालेल पण आपल्या मुलीला / मुलाला काही कमी पडणार नाही याची काळजी सर्वतोपरी ते घेत असतात. तसेच माझे हे स्पेशल आई बाबा..

पहिलं पाउल टाकण्यापासून, तसेच माझ्या नोकरीच्या काळात अडचणीच्या वेळी माझ्या मुलाला सांभाळण्यापासून ते अगदी आज हे माझे लहानपणाचे फोटो शेअर करण्यापर्यंत माझ्यासाठी  माझ्याबरोबर कायम असतात ते माझे आई बाबा..

दोघांनाही घरची आणि आर्थिक जबाबदारी असल्याने नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे काही वर्ष मला पाळणाघरात ठेवावं लागलं हि खंत कायम बोलून दाखवणारी आई.. जी मला पाळणाघरात सोडून जाताना अनेकदा स्वतःचे डोळे पुसत जायची आणि मला परत घेण्यासाठी संध्याकाळी साडेपाच हि वेळ काहीही करून गाठायची.. त्या काळात त्यांच्या परीने जितके लाड करता आले ते दोघांनीही केले.. आईने  त्याकाळातील वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे शिवून स्वेटर विणून सर्व हौस केली..

तसेच बाबा.. गाण्याची स्वतःला ऐकण्याची आवड, त्यात रेकॉर्ड जमवण्याचा छंद असल्याने लहानपणापासून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली त्यामुळेच गाण्याची आवड उत्पन्न झाली.आज जे काही गाण समजत ते तुमच्यामुळे.. नातेवाईकांबरोबर मैत्रिणी मित्र परिवार पण महत्वाचा असतो हे ते त्यांच्या अडचणीच्या काळात आलेले अनुभव सांगून कायम सांगायचे त्यामुळे नातेवाईकांइतकाच मोठा मित्रमैत्रिणी परिवार आजूबाजूला कायम असतो..

शेअरिंग मग तो खाऊ असो किंवा फटाके असो त्याने आनंद द्विगुणीतच होतो.. जग कसेही वागो आपण चांगलच वागावं, कायम हसमुख असणारे आणि कायम सकारात्मक विचार करणारे आणि नोकरीमधून निवृत्त झाल्यावर स्वतःकरता एकमेकांकरता आणि सर्वासाठी वेळ देणारे असे हे माझे स्पेशल आई बाबा.. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि तुमची साथ आणि आशीर्वाद अशीच ह्या पुढे आम्हाला लाभो हीच देवाकडे प्रार्थना..  !!
:) :)


#स्पेशलआईबाबा#KacchaLimbu

Friday, 20 July 2018

तुम्ही एखाद्याला किती वेळ देता, यापेक्षाही मिळालेल्या वेळेत काय देऊन जाता हे महत्वाच...

@ मी मनमुक्ता...

Thursday, 5 April 2018

तळमजला..

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते खरं आहे. आता जेंव्हा समवयीन बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा जुन्या आठवणींना अगदी सहजपणे उजाळा दिला जातोच.. अशीच एक आठवण – आठवण तळमजल्याची..!!
पूर्वी मोठमोठाले कॉम्प्लेक्सची संस्कृती नव्हती तरी त्यामानाने आम्ही जिथे राहायचो ती सोसायटी हि मोठीच म्हणायची. म्हणजे साधारण २५ बिऱ्हाडे होती. अंदाजे इयत्ता चौथी पर्यंत मी माझ्या आजीकडेच राहायला आणि सांभाळायला होते त्यामुळे सोसायटीमधील सर्वांशीच खूप संपर्क नसायचा. हा मात्र ठराविक घर अशी आहेत जिथे माझा मुक्काम नक्की असायचा. थोडक्यात सांगायचं तर पडिक असायचे मी.. ती घरं म्हणजे देसाई आणि टिकेकर काका काकू यांचे.. जणू काही तीदेखील माझीच घर आहेत अशा थाटात माझा वावर असायचा. आणि तो वावर इतका सहज असायचा कि त्यांच्याकडील येणारे पाहुणे पण विचारायचे कि तुमची मुलगी का?
गणपतीमध्ये देसाई काकूंकडे मला राहायचं असायच कारण त्यांच पाहुण्यांनी भरलेलं घर, गप्पा, एकत्र मिष्टान्न जेवण आणि त्यांचे पुतणी पुताण्यांबरोबर खेळ आणि गप्पा असा बेत मला कायम खुणावायचा. त्या काळात आई कटाक्षाने पढवून पाठवायची मला कि “आरती झाली, प्रसाद काकुनी दिला कि तडक घरी यायचं. जेवायला थांबायचं नाही.” पण नाही !! तसं कधीच व्हायचं नाही. काकूंनी आणि काकांनी सांगितलं कि त्यांच सांगण लगेच ऐकायचे आणि तडक शेजारी टिकेकर काकुच्या घरात जाऊन खिडकीतून आईला हाक मारायचे व ताट दाखवून ओरडायचे “आई आजच्या दिवसच जेवते ना !” हा संवाद अर्थात तळमजला आणि पहिला मजला असा चालायचा आणि पूर्ण सोसायटीला समजायचं कि मी आज देसाई काकूंकडे जेवणार आणि दुसरं म्हणजे “आजच्याच दिवस” हे गणपतीचे सातही दिवस असायचं कारण काकुकडे गौरी गणपती असायचे.

हि आठवण माझ्या एकटीची माझ्या पुरतीच फक्त माझीच..!! पण मग जसजसे मोठे होत गेलो सोसायटीमधील सर्व मित्रमंडळी चांगली परिचयाची झाली. हळूहळू शाळेतून घरी आल्यावर पोटात एकदाच काही ढकलून कधी खाली खेळायला जाऊ असं व्हायला लागलं..!! कारण रोज एक नवीन खेळ खेळायचं आकर्षण.. !! कारण प्रत्येक खेळाचा प्रमुख वेगळा असायचा..!! कधी बॅडमिंटन, आंधळी कोशिंबीर, चीनची भिंत, लगोरी, डबाइसपैस, खांब खांब खांबोळी, लंगडी, टीपी टीपी टीप टॉप, हे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. हे सर्व खेळत असताना आमच्या खेळण्याच्या वस्तू, रुमाल, चपला, रॅकेट्स, या वस्तू नीट ठेवण्यासाठी कायम आम्ही तळमजल्यावर राहणाऱ्या सर्वांनाच आणि मुख्यत्वे टिकेकर आणि देसाई काका काकूंना खूप त्रास द्यायचो. उन्हाळ्याच्या दिवसात तर इतके वेळा आम्ही पाणी पिण्यासाठी जायचो आणि ते पण अगदी आनंदाने गार पाणी कधी माठातील किंवा फ्रीजमधील प्यायला द्यायचे. हे करत असताना कधीच त्यांनी कंटाळा केला नाही. ऑफिसमधून दमून आलेले असले तरी कधी चिडले नाही. कधी कधी दोन्ही काकू आम्हाला खेळून दमला असाल म्हणून गोळी, चॉकलेट, बिस्कीट किंवा काही खाऊ हातावर ठेवायच्या. कधी कधी वेळेप्रसंगी ओरडायच्या पण ते देखील आमच्या चांगल्यासाठीच.. कारण खेळायला जाण्याची घाई असल्यामुळे उभ्याने पाणी पिऊन पाळायच असायचं.. मग काकूच वाक्य कानावर यायचं “अरे/ अग हळू आणि बसून पाणी प्या..!! नाहीतर पोटात दुखेल.” त्यावर “काही नाही दुखत..” असं म्हणून पळून जायचो. हे शाळा असो किंवा सुट्ट्या असो कायमच असायचं.
सुट्ट्यांमध्ये तर हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचा उपक्रम फक्त सुट्ट्यांमध्ये सकाळसाठी तळमजल्याची घर बदलायची... मग आम्ही लेले, सुबंध, कुलकर्णी परांजपे, सोपारकर यांना त्रास द्यायचो. या सर्वांनीच आमचे हे त्रास प्रेमाने सहन केलेच पण वेळेप्रसंगी कोणाला लाही लागलं, खुपलं तर औषध, मलमपट्टी देखील केली. यातूनच आमचं या सर्वांशीच एक वेगळच नात निर्माण झालं.

जसजसे मोठे झालो कॉलेज सुरु झाले मग हे सर्व खेळ बंद झाले पण कॉलेजमधून येता जाता काका काकुंना हॅलो म्हणून पुढे जायचो. मग खेळण्याचे साहित्य, रुमाल, चप्पल या वस्तूंची जागा घराच्या किल्ल्या/ चावी, वेळप्रसंगी काही निरोप यांनी घेतली. कॉलेजमधून किल्ली घ्यायला गेले कि पाणी प्यायला थांबायचे तेंव्हा घरचे कॉलेजच्या आणि इतर गप्पा व्हायच्या त्यात अर्धा तास कसा जायचा समजायचं नाही.. अशातच कधी वरच्या मजल्यावरची गोखले काकू छान उन्ह खात भाजी घेऊन येताना दिसायची, कोणी शाळेसाठी निघालेलं असायचं आणि अशातच परत तिथेच गप्पांचा अड्डा जमायचा.

या सर्वांना दिवाळीत सर्वात जास्त त्रास आम्ही दिला असेल. कारण सुट्टी लागली कि किल्ला करणे यासाठी पाण्याच्या बादलीपासून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतील त्या आम्ही मागायचो. आणि सर्वात कहर म्हणजे दिवाळीची पहाट.. पहिला अटमबॉम्ब कोण लावणार?? आम्ही म्हणायचो आम्ही लावणार पण तसं व्हायचाच नाही कारण इतक्या पहाटे उठायचोच नाही आणि बहुदा तो ‘सुशील कुलकर्णी’ किंवा ‘राहुल कुलकर्णी’च पहाटे ५ ला उठून लावायचे आणि मग आमची सुरुवात..!! जणू काही तो नियमच असावा सर्व प्रांजालीकारांना उठवण्याचा..!! तसच आमच्या मैत्रिणी आल्या नाही वेळेवर किंवा बाहेर जाण्यासाठी हाक मारायची झाली तर तीदेखील काकुच्या इथे उभी राहूनच जोरात हाक मारायची कारण तिथून हाक मारली कि आमचा आवाज घुमायचा.. त्याची आंम्हाला मजा वाटायची पण हे करताना, फटाके उडविताना त्यांना किती त्रास झाला असेल हा विचार तेंव्हा मनात कधीच आला नाही.. पण आता नक्कीच येतो. कारण कॉलेज संपल्यावर कोणाचे पुढचे शिक्षण, कोणाची नोकरी आणि मग लग्न होऊन एक एक जण मुख्यत्वे मुली सासरी गेल्या आणि काही दुसऱ्या नवीन मोठ्या जागेत राहायला गेले. माझंही फारस जाण आता होत नाही पण जेंव्हा जाते तेव्हा येता जाता खिडकीत टिकेकर काका काकू आहेत का हे पाहिलं जातं. असतील तर कधी खिडकीत उभे राहूनच गप्पा आणि चौकशी केली जाते. पण आता पूर्वीसारखा आमचा चहाचा अड्डा कधीतरीच जमतो.

हे सगळं एकीकडे घडत गेलं असलं तरी तळमजल्यावरची घर तशीच आहेत. त्यातील माणस काही आहेत, काही आता आपल्यात नाहीत, तर काही जागा सोडून गेले आणि तिथे नवीन बिऱ्हाडकरू आले. वेळेनुरूप संदर्भ बदलले. आता जेवढे तळमजल्यावर आमचे हक्काचे काका काकू आहेत त्यांचेही हात आणि डोळे थकले आहेत. हातात काठी, कंबरेला पट्टा आला आहे. हे सर्व जरी असलं तरी उत्साह मला लाजवेल असा आहे. कारण अजूनही “ये ग चहा प्यायला.. गप्पा मारायला असं म्हटलं जातच.!!” जे अजून तिथे आहेत त्यांना आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी नक्कीच आठवत असतील.. आत्ता हे लिहित असतानाच मी परत एकदा लहान झाले. मन भावूक झालं. यासाठी कि जगलेले हे क्षण परत येणार नाहीतच पण असे क्षण, हे खेळ, असा छान शेजार आपल्या मुलांना नक्कीच लाभणार नाही. आपण जरी हे क्षण जगलेले असलो आणि आपण जरी फेसबुक, व्होट्सअप, मोबाईल अशा अनेक माध्यमांमधून जोडले गेलो असलो तरी संवाद साधण्यासाठी वेळ सर्वांकडे आहेच असं नाही. आपली सोसायटी “प्रांजली” लवकरच कात टाकेल असे वारे वाहू लागले आहेत. म्हणजे तिथे आता मोठा १० - ११ मजल्याचा कॉम्प्लेक्स तयार होईल. जेंव्हा कोणतीही माध्यमे नसताना आपण एकमेकांना इतके जोडले गेलो होतो तेच आपण इतकी माध्यमे असताना देखील मनाने दूरच आहोत असं वाटत आणि हा टोलेजंग कॉम्प्लेक्स झाल्यावर आपल्यातील संवाद आणि आपल्याशी संवाद साधणारा तळमजला पण आपल्या प्रमाणेच बंदिस्त होईल कि काय असं वाटतय.
फेसबुकवरून फिलिंग हॅपी स्टेट्स टाकणारे किंवा चेक इन टू आणि लाईक करण्याच्या या जगात राहणारे आपण आपलं बालपण, तळमजला, तिथे राहणारी माणस यांना नुसत्या आठवणीतच नाही तर संवादातून जपूया.. फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी.. आपल्या आई बाबांसाठी.. आपल्या लाडक्या शेजार्यांसाठी.. !!
तुम्हाला काय वाटत.??

स्वप्ना..

Thursday, 22 March 2018

"गुलाबजाम" - चव मनात आणि जिभेवर रेंगाळणारी ...!!

गोड खायला कोणाला आवडत नाही ? पण हाच गोडवा चित्रपटांमध्ये आला किंवा चित्रपटाच नाव हेच एका गोड पदार्थाच असेल तर काय मजा ना..!! अगदी बरोबर ओळखलत.. तुम्हाला वाटलं त्याच चित्रपटाबद्दल बोलतेय.. नाव अर्थात "गुलाबजाम" !!

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाच ट्रेलर पाहिलं.. अर्थात ते पाहूनच ठरवलं कि हा चित्रपट नक्की पहायचा. कारण त्याची अनेक..! एक म्हणजे चित्रपटाच नाव हि माझी ऑल टाईम फेवरेट स्वीट डिश.. त्यात दोन्हीही कलाकार आवडीचे.. आणि चित्रपटचा ट्रेलर अत्यंत गोड..

चित्रपट समीक्षक मी अजिबात नाही पण माहित नाही का लिहावसं वाटलं या चित्रपटाविषयी म्हणून थोडसं माझं मत.

मराठी चित्रपटाचा दर्जा हा दिवसेंदिवस जास्त उच्च होत आहे. वेगवेगळे प्रयोग देखील होत आहे. आणि "गुलाबजाम" हा चित्रपट प्रदर्शित करून या टीम ने महाराष्ट्रीयन पदार्थ किंवा जेवण हे सात समुद्रापलीकडे नेण्याचा प्रयत्न खूप छान केला. तो आवडला आणि यशस्वी देखील झाला असं मला तरी वाटतं..

त्यात सोनाली कुलकर्णी ( राधा ) आणि सिध्दार्थ चांदेकर ( आदित्य ) यांच्यातील संवाद, त्यांचा अभिनय, आणि त्यांच्यात वेगळच निर्माण झालेलं तरल नात ( ज्याला नाव देण योग्य नाही ) त्यातील सात्विकता हि खूप भावली.

आपल्या महाराष्ट्रीयन खाण्यामध्ये इतकी विविधता आहे आणि ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच होता. त्याक्षणी भूक आवरली नाहीच पण "तोंडाला पाणी सुटणे" हि म्हण आठवली आणि कशाला असतं हे डाएट असं पण वाटलं.

पदार्थ बनविताना असणारे ( background sound ) एकदम सुरेख..!!

चित्रपट म्हणजे नक्की असतं तरी काय एक निखळ मनोरंजन.. !! पण माझ्या मते चित्रपट म्हणजे ३ तास फक्त खुर्चीला खिळवून ठेवणे असे नसून त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा हे दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहोत असे समजून ते ३ तास आपण जेंव्हा तो पूर्ण चित्रपट जगतो तो खरा चित्रपट.. "गुलाबजाम" पाहताना हा अनुभव नक्कीच आला.

अजूनही हा चित्रपट कोणाचा पाहायचा राहिला असेल तर नक्की पहा..!! मनात एक गोडवा साठवूनच चित्रपटगृहातून बाहेर याल.. :) आजही मनात या "गुलाबजाम" ची चव मनात अजूनही रेंगाळत आहे आणि अशीच राहील.

"गुलाबजाम" च्या सर्व टीम आणि सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..!!

स्वप्ना..

https://www.facebook.com/GoldenGateMotionPictures/videos/2071048423114137/?t=26

Saturday, 2 December 2017

सावली

सावली

आयुष्यात आपल्याला  बरीच  अनोळखी  माणसे  भेटतात,
कालांतराने  तेच  अनोळखी चेहेरे आपल्या  आयुष्याचा एक भाग होतात.
वेळेनुरूप काही साथ सोडून जातात, तर काही आपले आयुष्यच होतात..
पण, त्याहूनही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला  साथ देते...
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत....
ती म्हणजे.....
'सावली'

ऋतू बदलतात तसे आपले दिवस बदलतात,
त्यानुरूप माणसे बदलतात, त्यांचे आपल्याशी वागणे बदलते
इतकेच नव्हे तर आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी  ह्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे...
"सावली"


ग्लास पाण्याने अर्धा भरलेला असो वा रिकामा,
मिष्टान्न भोजनाचा योग असो वा असो खावयास मुठभर चुरमुरे
घालावयास  मिळो रेशमी वस्त्रे वा असो  "पुरानी जीन्स "
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे...
"सावली"


सर्वांबरोबर असूनही एकटीच असते
ती म्हणजे...

"सावली"

Monday, 14 August 2017

निमित्त बुकगंगाच्या वाढदिवसाचे..

गर्दीबरोबर सर्वच जण चालतात आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात. पण गर्दीपासून दूर जाऊन स्वतःची वेगळी वाट शोधून आपल्या इच्छित स्थळी जाणारे आणि स्वतःची अशी वेगळी प्रतिमा तयार करणारे फार थोडेच म्हणावे लागतील.. असं लिहायचं कारण असं कि आज आहे बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाचा सातवा वाढदिवस..!!

बुकगंगा डॉट कॉम चे संस्थापक मंदार जोगळेकर हे अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया येथे अत्यंत चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असतानादेखील निव्वळ साहित्याची आणि वाचनाची आवड यामुळे आपल्या साहित्याचा प्रसार जगभरात व्हावा आणि सर्व प्रकारची, प्रकाशनाची पुस्तके हि एका क्लिक वर किंवा फोनवर ऑर्डर देऊन अगदी घरपोच मिळावी हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून १५ ऑगस्ट २०१० रोजी बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाची सुरुवात केली.

मला आठवतंय माझा पहिला दिवस जेंव्हा मी बुकगंगाचं ऑफिस पहायला गेले होते. तेव्हा बुकगंगा परिवार हा अंदाजे २० जणांचाच होता.. पण आता तो अंदाजे १०० जणांचा आहे.. ग्राहकांकडून पुस्तकांची मागणी जशी येईल तशी पुस्तके बाजारातून आणून त्यांना घरपोच पाठविली जायची. पुस्तकांचा स्टॉक असा मोठ्या प्रमाणावर ठेवला जात नव्हता. पण त्यानंतर हळूहळू प्रकाशकांशी संवाद साधून बुकगंगाचे कार्य आणि आवाका हा त्यांना पटवून दिल्यावर प्रकाशकांकडून पुस्तके स्टॉकसाठी मिळायला लागली. पुस्तके स्टॉकला असल्यामुळे अर्थात ऑर्डर पटापट ग्राहकांसाठी पाठवता येऊ लागल्या. त्याचबरोबरीने जी पुस्तके आता प्रकाशित होत नाहीत किवा देशाबाहेरील वाचकांना ती एका क्लिकवर विकत घेऊन पुढील दोन मिनिटामध्ये वाचता यावीत म्हणून “ई-बुक” ह्या संकल्पनेला सुरुवात केली. “ई-बुक”चे वाढते काम पाहता “ई-बुक” तयार करण्यासाठी एक वेगळी टीम हि रत्नागिरी जिल्ह्यामधील साखरपा सारख्या छोट्या खेड्यामध्ये काम करू लागली. तेथील ऑफिस सुरु करण्यामागील हेतू हा निव्वळ सामाजिक बांधिलकी हा जोगळेकरांचा होता. या टीमला “ई-बुक” तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून खास टीम पाठवण्यात आली होती. मुलींनी स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे हा उदात्त हेतू चांगलाच सफल झाला हे आता “ई- बुक” ची संख्या १५००० पेक्षा जास्त संकेतस्थळावर आहे यातूनच दिसून येते.

हे सर्व करत असताना ग्राहकांच्या तक्रारी किंवा त्यांचे ऑर्डर संबंधित प्रश्न किंवा जिथे इंटरनेट सुविधा नाही पण ज्यांना पुस्तकांची ऑर्डर नोंदवायची असेल अशा गोष्टींची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आणि त्याची पूर्तता हि रत्नागिरी येथे कॉल सेंटर ( ग्राहक सेवा केंद्र ) सुरु करून झाली. तिथे २० जणांची टीम कार्यरत आहे.

त्यानंतर १ मार्च २०१५ रोजी पुण्यातील नावाजलेले इंटरनॅशनल बुक सर्विस ह्या दुकानाचे पुनरुजीवन करून “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” या नावाने सुरुवात केली. बुकगंगासाठी हा खूप महत्वाचा टप्पा ठरला कारण ह्या वास्तूला स्वतःचा असा इतिहास आहेच कारण या वास्तूला अनेक साहित्यिकांचे पाय तर लागलेच पण आंबेडकर, नेहेरू यांसारखे नेते त्यांना हव्या त्या पुस्तकांची मागणी तेथूनच करत हि खूप मानाची गोष्ट.. त्यामुळे हे वलय तसेच टिकून ठेवणे म्हणजे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. पण त्यात देखील यश आले ते सरांचे योग्य मार्गदर्शन आणि सर्व टीमने घेतलेल्या कष्टामुळेच..!!

त्यानंतर स्वतःच पुस्तके प्रकाशित आपण का करू नये हा मनात विचार येऊन “बुकगंगा पब्लिकेशन्स”ला  सुरुवात झाली. आणि “बी positive” हे पहिले पुस्तक पिंपरी चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले. आणि आजपर्यंत “बुकगंगा पब्लिकेशन्स”तर्फे १८ पुस्तके मान्यवर लेखकांची प्रकाशित करण्यात आली.

आतापर्यंत केल त्याहून जास्त आणि वेगळ करायचं हे कायमच जोगळेकर म्हणायचे आणि म्हणून मागील वर्षापासून “ऑडिओ बुक” या संकल्पनेला सुरुवात झाली ती हि ग्राहकांना मोफत दिवाळी अंक उपलब्ध करून देऊन..!! आत्तापर्यंत ८० “ऑडिओ बुक” संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 गेल्या ७ वर्षातील बुकगंगाचा हा प्रवास हा नक्कीच उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रत्यक्ष आता तिथे नसले तरी ३ खोल्यांच्या छोट्या ऑफिस पासून ते पुण्यातच अजून एक ऑफिस, साखरपा आणि रत्नागिरी अशा दोन शाखा, आणि “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” हे पुस्तकांचे दालन अशा प्रवासाची मी साक्षीदार होते याचा कायम अभिमान राहील. अर्थात हे सांगत असताना माझे सर्व सहकारी आणि मला ज्यांनी प्रशिक्षण दिले असे आमचे संस्थापक मंदार जोगळेकर आणि विवेक चितळे सर यांचा उल्लेख हा महत्वाचा ठरतो कारण यांच्याशिवाय मी करत असलेल्या कामांमधील महत्वाचे टप्पे पार करणे कठीणच झाले असते.

तर असा हा थोडक्यात घेतलेला बुकगंगा.कॉमचा वेध.. आणि तो हि बुकगंगा.कॉम च्या वाढदिवसानिमित्त..!! बुकगंगा.कॉम ची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि मंदार जोगळेकर यांनी लावलेल्या ह्या छोट्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष होवो..!! आणि बहार येवो याच शुभकामना..!!

श्रावणी..





Sunday, 7 May 2017

क्षण..

आज तुला जाऊन बरोबर सात दिवस झाले काही लिहावसं वाटलं म्हणून तुझ्यासाठी..

काही वर्षांपूर्वी दोन ओळी सुचलेल्या त्या अशा कि

क्षण असा जो ठेविला आहे मी जपुनी
येईल का योग तो परत जगण्याचा जुळुनी..??

मलाच सुचलेलं वाक्य मलाच आज  हास्यास्पद वाटत आहे पण काल प्रकर्षाने या वाक्याची आठवण आणि त्याबरोबरीने अनेक सुंदर, गमतीशीर क्षणांची आठवण झाली. कारण पण तसचं होतं. दुपारी दुकानात असताना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. योग असा कि सहसा अनोळखी नंबर वरून येणारे फोन टाळणारी मी तो फोन उचलला पण.. आणि समोरून कानावर पडलेले शब्द ऐकून क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं.

क्षणभर बिलिंग काउंटर वर आपण आहोत याचा विसर पण पडला. आज न उद्या हि बातमी कानावर येणार याची कल्पना काही दिवसांपूर्वीच आली होती पण मन वेड असतं ना..!! परत फोन करते असं सांगून फोन ठेवला. घराकडे पाय वळले आणि डोळ्यासमोर वर्षभराच्या आठवणी चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे डोळ्यासमोरून गेल्या.

बेताचीच उंची, गहूवर्णी, कुरळे केस, डोळ्यात काजळ आणि चुणचुणीत अशी अगदी कॉलेजमध्ये जाणारी मुलगीच वाटावी अशी मानसी आमच्या ऑफिस मध्ये अकाउंट विभागामध्ये रुजू झाली. माझा आणि ह्या विभागाचा फार कमी संबंध किंवा आलाच तरी महिन्यातून एखाद दोन वेळाच.. !! पण म्हणतात ना माणसं भेटणं, त्यांचा सहवास आणि त्यांच्या आठवणी हा पण एक योगायोगच असतो. मानसीच्या बाबतीत पण तसंच झालं.
नवीन असल्याने फारशी न बोलणारी मानसी हि आमच्या जेवणाचा एक ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये येऊ लागली आणि कधी आमच्यातील एक झाली हे समजल नाही. बरेचदा काम पूर्ण करण्याच्या गडबडीत जेवणाची वेळ कधी तिची, तर कधी माझी चुकायची पण एकही दिवस असा  गेला नाही कि तुम्ही जेवलात का? किंवा मी बाहेर जात आहे तुमच्यासाठी काही खायला आणू का? असं मला तिने विचारलं नाही अस कधीच झाल नाही.

जेवणाच्या सुट्टीत आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या मग त्या फॅशन,चित्रपट, पाककृती, असो किंवा आमच्या मुलांच्या आवडी निवडी किंवा त्यांचे किस्से... कधी कधी मुलाचं आजारपण असलं कि घरगुती विषय देखील व्हायचे. मानसीच्या घरची मला फार माहिती नव्हती पण जेंव्हा केंव्हा ती बोलायची तेव्हा वाटायचं कि तिला बरंच काही सांगायचं आहे. आणि माझा हा अंदाज खरं पण ठरला कारण एक दोन वेळेला ती माझ्याजवळ येऊन तिला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे असं तिनं व्यक्त  पण केलं, तेव्हा आणि त्यानंतर मी तिला तुला काय सांगायचं आहे हे बोल म्हटलं पण नंतर बोलू असं म्हणायची आणि जे सांगायचं आहे ते राहून गेलं आणि तेही कायमचच..!!

मानसीला कोणत्याही प्रकारची वेशभूषा छानच दिसायची.. पार्टी वेअर, वेस्टर्न ड्रेस, साडी, स्कर्ट्स देखील.. तिला जेंव्हा केंव्हा सांगायचे कि तुला हा ड्रेस किंवा हा लूक छान दिसतोय तेव्हा म्हणायची कि मॅडम तुम्हाला देखील छान दिसेल तुम्ही पण एकदा असा ड्रेस घालूनच बघा.. मला आठवतंय मी ऑफिसच्या दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झाले तेव्हा तिला वाईट वाटलं होतं कारण बोलणं कमी होणार आणि खाण्याच्या फर्माईश यथेच्छ पुरवता येणार नव्हत्या. पण फार काळ आम्ही वेगळ्या राहिलो नाही पुढील काही महिन्यातच ती आम्ही बसायचो त्याच इमारतीत शिफ्ट झाली.

माझं ऑफिसमधून राजीनामा देऊन बाहेर पडणं हे तिला माहित नव्हतं. त्यामुळे ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तिथून बाहेर पडल्यावर तिचा मला फोन येणार हे अपेक्षित होत.. पण मी राजीनामा का दिला ह्यावर चर्चा होऊ नये म्हणून मी कोणत्याही सहकाऱ्यांचे फोन घेऊ नयेत अस मला सांगण्यात आल होत. आणि तसंच झालं.. तिचा फोन आला, बेल वाजत राहिली.. मी फक्त पाहत राहिले अन् फोन घेतला नाही.. त्यानंतर काही दिवसांनी वाटलं कि फोन करावा अन बोलावं पण परत चर्चेला कारण नको म्हणून फोन केला नाही.

आता अशी परिस्थिती आहे कि एक वेळ फोन वाजेल.. फोन उचाललादेखील जाईल पण पलिकडेच काय मानसीचा आवाज  कुठेच नसेल.. कारण ती कायमचीच निघून गेली एकटीच तिच्याच प्रश्नाची उत्तरे शोधत किंवा अनुत्तरीत प्रश्नांसहित.. आणि माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह ठेवून कि मॅडम माझा फोन तुम्ही त्या दिवशी का उचलला नाही?

ह्या एका प्रश्नाने मी स्वतः खूप अजूनही बेचैन होते आणि म्हणूनच सांगते कायम मनाचं ऐका कारण माणसं एक वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला चार गोष्टी करायला सांगतील पण त्यावर तुमच मन हे तुम्हाला कायम योग्यच सांगेल.. माझ्या मनाने मलाही कौल तेव्हा हा तिचा फोन उचल असाच दिला होता पण..

आणि आता ह्यावर बोलून काहीच फायदा नसला तरी व्यक्त होऊन तिची माफी मागावी असं निश्चित वाटलं आणि म्हणून हि माझी चार वाक्य..

मानसी तुझी आठवण हि कायम तुझ्या बडबडीइतकीच येत राहील तुझ्या अनुत्तरीत प्रश्नासहित.. !!

..

Sunday, 12 March 2017

मन..

मनात बरेच काही करण्याची इच्छा असते,पण कधी वेळ तर कधी परिस्थिती साथ देत नाही,
आणि मग सुरु होतो आपलाच आपल्या मनाशी संघर्ष...
आपली इच्छा  आणि कार्यक्षमता कमी पडतेय कि काय असं जाणवायला लागतं
आणि सुरु होतो खटाटोप आपल्यातील हि उणीव लपवण्याचा,
पण आपण त्यातही अपयशीच ठरतो कारण आपल्यात एक मन असतं जे आपल्याला शांत बसून देत नाही,
कारण ते धाव घेत असतं आजूबाजूच्या मनांचा आणि गोष्टींचा.

मी मनमुक्ता..
८ एप्रिल २०२३

Monday, 23 January 2017

ना समजले कधी, केंव्हा, कसे जुळले हे भावबंध..
अतूट राहतील आपल्यातील ऋणानुबंध..