Tuesday, 27 August 2019

दाद

दाद.

प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या कलेची आवड असते. काळानुरूप किंवा काम, करियर, संसार या सर्व गोष्टीत ती जोपासली जातेच असं नाही. पण अशीही काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात जी कला जिवंत ठेवण्यासाठी किंवा स्वतःला नुसती आवड आहे म्हणून दुसऱ्यांना कायम प्रोत्साहन देतात.

केदार आणि माझी ओळख 2 वर्षांपूर्वीची, ती देखील आमच्या सवाई गंधर्व चा ग्रुप आहे त्यात तो सामिल झाल्यामुळे झालेली. हा पेशाने वकिल असला तरी संगीताची आवड. कोर्टामधे भले न्यायाधीशसमोर मोठ मोठ्याने हा आपल्या अशिलाची बाजु मांडत असेलही पण ग्रुप मधे तसा शांतच म्हणून ओळखला जातो. नाटकाची आवड म्हणजे परफॉर्म करण्याची हौस आहे हे याच वर्षी समजल.

ओळख जितकी जुनी होत जाते तसतस आपण माणसांना जास्त ओळखू लागतो त्याचप्रमाणे त्याच्या काही स्वभावांचे पैलुही हळूहळू कळायला लागतात. केदार तू मनाने पण तितकाच मोठा असशील हे मागील आठवड्यात आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ वरुन पक्क झालं.

झालं असं की केदार पनवेलचा. तालुका पोलिस स्टेशनच्या बाजूला एक चांभारवाला बसतो ज्याला बासरी वाजवताना त्याने ऐकला होत आणि त्याने स्वतः पण थांबून ऐकल होतं त्याचं बासरी वादन पण चप्पल दुरुस्तीचा योग कधी आला नव्हता, जो मागील आठवड्यात आला. मग काय केदार वकिल सोडतोय का चांभाराला!!! केसच्या जशा तारीख पे तारीख पडत जातात त्याप्रमाणेच केदार ने त्या चांभाराला य प्रश्न विचारले.

अत्यंत साध्या कुटुंबातील, बायका पोरांची जबाबदारी असणारा चांभार अंदाजे दिवसाला चप्पल शिवुन 400/- कमावत असेल. पण बासरीची मनापासून आवड असल्याने केदारने बासरीचा विषय काढल्यावर चेहरा त्याचा खुलला आणि तो त्याविषयी बोलू लागला. त्याने केदार ला "पंख होते तो उड आती रे' हे गाणं देखील वाजवून दाखवले. चांभार वाजवत असलेली बासरी ही उन्हामुळे आणि आताच्या दमट हवेमुळे थोड़ी वाकडी झाली होती पण तरीही त्यातून तो फार सुरेल सुर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता जेंव्हा काही ठिकाणी ते योग्य लागत नव्हते तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरील खंत स्पष्ट केदारला दिसत होती.

इतकं सुंदर वाजवतोस तर छान शिकत का नाही? असा प्रश्न केदारन विचारला खरा पण, त्यावर, " साहेब जेमतेम पोटापुरते पैसे मिळतात, त्यात हे लाड कुठून करायचे?!!!" अस उत्तरुन त्याने वास्तवतेची जाणीव करून दिली. ते ऐकून केदार घरी यायला निघाला पण त्याच्या डोळ्यासमोर त्या चांभाराचा चेहरा आणि त्याचं शेवटच वाक्य मनात घर करून राहिलं. त्याच मनस्थितीत माझ्यामते हा अनुभव त्याने आमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर लिहून पोस्ट केला. आणि पुढे लिहिल की त्या चांभारला मी बासरी घेऊन देणार. त्याने लिहिलेल्या या अनुभवाच आम्ही सर्वांनीच कौतुक केलं. पण मला असही वाटलं की हा इतका त्याच्याच रूटीन मधे व्यग्र असतो कधी बरं हा त्या चांभारासाठी बासरी आणेल. पण त्याने त्याचं बोलण खरं करून दाखवलं. गोकुळअष्टमी सारखा छान दिवस गाठून त्याने त्या चांभाराला बासरी विकत घेऊन त्याकडे सुपूर्त केली.

इतकच नाही तर त्याच्या पोस्ट वर मी तेंव्हा लिहिलं होतं की जेंव्हा त्याला बासरी देशील तेंव्हा त्याला ती वाजवायला सांग आणि त्याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड कर. आणि केदार ने तसं केलही. त्याच्या या उत्साहाला सलाम!!! आणि एखाद्याच्या अंगी असलेल्या कलेला अशा प्रकारे दाद देण्याची कल्पना खुप आवडली. त्याचा हा उत्साह पाहून माझी मैत्रिण अश्विनी हिनेही मी काहीतरी यावर लिहावं असं सुचवल.

मग काय असा कलाकार आणि दाद देणारे असे हे माझे मित्र मैत्रिण यांच्या कौतुकासाठी माझी हि पोस्ट - दाद!!!

©️स्वप्ना शेंडे भिडे.
२७ ऑगस्ट २०१९


Monday, 29 July 2019

Smile Please!!!

रिपोर्ट्सच्या फाइलकडे पाहून हि माझी ओळख नसणारे तर माझं काम माझी ओळख असणार आहे... किंवा जोपर्यंत लक्षात आहे तोपर्यंत विचार... असे संवाद आणि त्याबरोबर तितक्याच सहजतने आणि ताकदीने आपली भूमिका वठविताना मोठ्या पडद्यावर दिसणारी नंदिनी, नंदू म्हणजेच मुक्ता बर्व परत एकदा मनात घर करून गेली.

गोष्ट एक नामांकित फोटोग्राफर, जिला आयुष्यात आपल्याला काय हवे आहे, काय करायचं आहे हे खुप स्पष्ट आहे. धडाडीची, महत्वाकांक्षी आणि स्वतःच्या क्षेत्रात नावलौकिक असलेली नंदिनी हिला मोठ्या पडद्यावर पाहताना हि तर आपल्यातीलच एक आहे आणि असं काही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं अगदी माझ्याही!!! असं नक्कीच मनात येऊन जातं.

दैनंदिन जीवनातील गोष्टी अगदी सहज करणारी नंदिनी काही साध्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी विसरते. हि गोष्ट ती तिच्या कॉलेजपासून ओळखत असणाऱ्या डॉक्टर मैत्रीणीला सांगते. तिच्या सांगण्यावरून नंदिनीच्या वैद्यकीय चाचण्या होतात आणि त्यातून जे समजतं तेव्हापासून ते चित्रपट संपेपर्यंत पडद्यावर दिसणारी नंदिनी हि आपलीच कोणीतरी एक असावी असं वाटत.

ज्यावर काही औषध नाही असा आजार आपल्याला झाला आहे हे वडिलांपासून लपवणारी आणि नंतर
ऑफिसचे कागद शोधताना रिपोर्ट्सची फाईल वडिलांना मिळाल्यावर त्यांना घट्ट बिलगणारी नंदिनी...
आपल्याला डिमेंशिया कसा काय होऊ शकतो आणि तो झाला आहे हे आधी नाकरणारी पण असेल झाला तरी मी माझं आयुष्य तितक्याच आनंदनं जगणार असं आपल्यापासून विभक्त झालेल्या नवऱ्याला सांगणारी नंदिनी...
कालांतराने हा आजार जास्तच बळावल्यानंतर वयात येणाऱ्या आपल्या मुलीला एकच प्रश्न अनेकदा विचारणारी आणि त्यामुळे चिडलेल्या आपल्या मुलीशी तितकीच शांतपणे बोलणारी नंदिनी...
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हरवलेली, आवाज, गोंगाट सहन न होणारी, रस्ता विसरलेली नंदिनी, जिला विराज नावाचा युवक जो त्यांच्याकडेच काही दिवसांसाठी राहायला आलेल्या या पाहुण्याचे एका क्षणी आभार मानणारी आणि दुसऱ्याच क्षणी हा कोण इथे कशाला आला असं म्हणणारी नंदिनी ...
या आणि अशा अनेक दृश्यांमधून आपल्या आजारविषयी राग, तर कधी त्यामुळे आलेली निराशा, हतबलता... तसचं मूळ महत्वाकांक्षी स्वभाव असणारी आणि धडाडीने तितक्याच जोमाने स्वतःला यातून बाहेर काढण्यासाठी झगडणारी नंदिनी हि मुक्ताने अत्यंत ताकदीने साकराली आहे.

बायकोपासून विभक्त झालेला, आणि आपली मुलगी नूपुर च्या वडिलांची भूमिका साकरणारा प्रसाद ओक याने काही प्रसंगातुन डोकवणारा पुरुषी अहंकार, पण विभक्त झाला असला तरी नंदिनी विषयी काळजी करणारा आणि घेणारा नवरा, तसच मुलीवर कधी प्रेम तर वेळप्रसंगी तिला दटावणारा एक बाप खुप छान रंगविला आहे.

आपली आई ही आई नसून शत्रुच आहे. जीने आपल्यापेक्षा आपल्या करियर ला महत्व देऊन आपल्याकडे दुर्लक्ष केलं ही मानसिकता घेऊन वयात आलेली नूपुर, तिच्या सहवासासाठी आतुर असलेली नंदिनी आणि त्या दोघींमधील काळानुरूप वाढत चाललेली दरी हि अनेक प्रसंगातुन दिसून येते. नूपुर ची भूमिका साकरलेली वेदश्री महाजन हिने वयात येणाऱ्या मुलीचे मूड, राग, आईवडिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, त्या पूर्ण होण्यासाठी केलेला हट्ट, प्रसंगी आईचा किंवा बाबांचा रागराग आणि आईचा न बरा होणारा आजार समजल्यावर हीच काय ती वेळ आहे तिला समजून घेण्याची असं सांगणाऱ्या विराजच्या बोलण्यावर आधी फारसा विचार न करणारी आणि नंतर परिस्थिति समजून आईची काळजी आणि तिला परत उभ करण्यासाठी विराज ला साथ देणारी नूपुर आवडली.

सतीश आळेकर यांनी नंदिनीच्या वडिलांची भूमिका मस्त निभावलीच पण बरोबरीने एक आजोबा, सासरा, मित्र अशा छटा छान रंगवल्या.

मूळचा नागपुरकर पण कामानिमित्त प्रथमच मुंबईत आलेला आणि कोणीच ओळखीचे मुंबईत नसल्याने काही दिवस पाहुणा म्हणून नंदिनीच्या वडिलांच्या घरी  राहायला आलेला विराज म्हणजेच ललित प्रभाकर. लहानपणीच आईवडिलांची छत्रछाया गमावल्यामुळे त्यांच्या प्रेमापासून वंचित राहिलेला विराज हा नंदिनीसाठी देवदूतच ठरतो. नंदिनीच्या
आजाराविषयी समजल्यावर, फारशा आशा न उरलेल्या आणि प्रत्त्येक दिवस एक नविन आव्हान म्हणून पेलणाऱ्या नंदिनीची, स्वतःच वेगळेपण जपणाऱ्या नंदिनीशी तो नव्याने ओळख करून देतो. हे सर्व करत असताना त्याने निखळ मैत्री असणारी मित्राची भूमिका इतकी छान केली आहे की कोणालाही अगदी सहज वाटेल की आपला असा एखादा मित्र नक्कीच असावा.

अदिती गोवित्रीकर ने डॉक्टर मैत्रीणिची भूमिका हि चांगली निभावली आहे. मूलतः मॉडेल म्हणून नावरूपास आलेली अदितीचा अभिनय असलेला मी पहिलेला पहिलाच चित्रपट, त्यामुळे अभिनय चांगला बरा हे मी ठरवणं योग्य नाही.

विक्रम फडणीस हा उत्तम फॅशन डिझायनर तर आहेच पण त्याने स्माइल प्लीज या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाद्वारे  अगदी सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा खुप छान प्रयत्न केला आहे. एक मात्र निश्चित की चित्रपटात डिमेंशिया या आजाराचा धागा घेऊन हा आजार झाल्यावर रुग्णाची होणारी अवस्था आणि त्यामुळे त्याच्या आप्तेष्टांचे रुग्णासोबत जग बदलते आणि अशावेळी त्याच्याभोवती त्याला समजून घेणारी माणसं मग ते नातेवाईक किंवा एखादा छानसा मित्र किंवा मैत्रिण असे सर्व असेल तर रुग्णाच जगण थोडं सुकर होऊन आयुष्य जगण्याची उर्मी त्याच्यात नक्कीच निर्माण होऊ शकते. त्याच बरोबरीने हा आजार बरा होणारा नाही हे जितकं सत्य आहे तितकच या आजाराविषयी जास्तीत जास्त जाणून घेऊन, त्या रुग्णाविषयी कोणतेही गैरसमज न करता किंवा ते न पसरवता योग्य तो मदतीचा हात दिला तर त्या माणसाचं उर्वरित आयुष्य थोडं तरी सुसह्य करू शकतो असा संदेश छान पोहोचवला आहे.

थोडक्यात काय चेहऱ्यावर एक छोटीशी हास्याची रेष समोरच्याच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणु शकते हे निश्चित...!!! आणि म्हणूनच
Smile Please!!! 😊

©️स्वप्ना शेंडे भिडे.
https://muktashravansari.blogspot.com



Monday, 27 May 2019

आई, कॉफी आणि मी... 🙂
बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. तसं म्हटलं तर ठाण्याला येणं हे अधून मधून होतंच असत. येण्याची वर्दी आधीच दिली असली कि भेटीगाठीचे कार्यक्रम आणि कामांची यादी पण तशी तयारच असते. पण यावेळी जरा बदल केला.
शनिवारी निघून रविवारी पुण्यात परत जाणारी मी रविवारी उशिरा इथे आले. पुण्याहून निघतानाच सगळं ठरलेल असतं पण यावेळी नक्की असं काहीच ठरवलं नव्हतं. नक्की इतकच होत कि गौरांगला घेऊन परत पुण्यात यायच.
एरवी कॉफीचे नेहेमीच्या अड्ड्यावर भेटण्याचे किंवा एकत्र आपल्या मित्रमैत्रिणी किंवा घरच्यांसोबत जेवायला बाहेर जायचे कार्यक्रम घडवून आणण्यास उत्सुक असणाऱ्या मला या खेपेस अजिबात उत्साह नव्हता. त्यामुळे आजचा दिवस आई बाबांसोबत आणि माझं फेसबुकच काम करण्यात घालवला.
संध्याकाळी आईसोबत एक चक्कर मारायला जायच ठरवून मी बाहेर पडले. ती आधीच तिच्या संस्कार भारतीच्या कामासाठी बाहेर गेली होती त्यामुळे तिला गोखले रोडवर एका ठिकाणी भेटायचं ठरलं.
सोमवार असल्याने दुकाने शक्यतो बंद आणि त्या दिवशी बंद दुकानांच्या बाहेर कपडे, पर्सेस, टीशर्ट्स वगैरेची दुकानं थाटलेली असतात त्यामुळे खरेदी नाही केली तरी चालत एक छान फेरी मारून होईल हा विचार मनात धरून मी आणि आईने चालायला सुरुवात केली. गोखले रोड म्हणजे पायाखालचा रस्ता त्यामुळे कुठे पोहोचल्यावर कोणत्या पदार्थांचे वास येणार हे माहित होतं. उन्हाळ्यामुळे माझी आणि आईची स्थिती सारखीच होती. त्यातच तिला रात्री जेवायला काय करू याची भ्रांत होतीच. पण तिला कंटाळा देखील आला होता. तिने काहीतरी चटपटीत खायचं का? विचारल्यावर मी चालतंय कि म्हटलं 🙂 पण मग त खायचं तर काय खायचं यावर चर्चा. तिने गोखले उपहार गृह, अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र अशी नवे घेतल्यावर मी अत्यंत आंबट चेहेरा करून त्यापेक्षा घरीच जेवू म्हटल. शेवटी हो नाही करत तिच्याच आवडीच्या हॉटेल मध्ये "सुरज" राम मारुती रोडला आहे तिथे जायचं ठरलं.
एसी मध्ये बसून मनसोक्त तिने शेजवान स्प्रिंग डोसा आणि मी चीज ओनियन उत्तपा यावर ताव मारला. खात असताना ती त्या हॉटेल मध्ये अनेक वेळा आल्यामुळे वेगवेगळ्या आठवणी सांगत होती.मध्येच तिचा फोटो, कॉफीच्या कप्सचा फोटो क्लिक केला. उठसुठ फोटो काढत असते हे तिला माहित असल्याने तिने फारशी फोटो का क्लिक करते हि चौकशी न करता फोटो काढून दिला. तिला कुठे माहित होतं कि मी तिचा फोटो का क्लिक करतेय ते...!!! गप्पांमध्ये असंही तिनं सांगितलं कि सुरजमध्ये कॉफी छान मिळते आणि डोसा/उत्तप्पा खाल्यावर कॉफी नाही म्हणजे नाइन्साफच...!!! म्हणून कॉफी ऑर्डर केली.घरी बाबांसाठी आणि गौरांग साठी त्यांच्या आवडीचे पार्सल घेऊन मस्त गप्पा मारत, परत रमत गमत चालत घरी पोहोचलो.
घरी येताना मनात हाच विचार आला कि इतके वेळा मी येते पण आपण दोघी जाऊया बाहेर कॉफी प्यायला किंवा खायला हे आईने कधीच बोलून दाखवले नाही कायम पूर्ण कुटुंब एकत्र जाऊ असं म्हणायची. पण आज काहीच न ठरवता जुळून आलेला योग खूप आनंद देऊन गेला.आणि म्हणूनच असं वाटत कि आपल्यासारख CCD, Strabucks,Barista यांसारख्या ठिकाणी कॉफीला तुम्ही का जाता हा प्रश्न आणि त्यावर का जातो हे तिला समजावून सांगण्यापेक्षा एखादवेळी तिच्या आवडीच्या ठिकाणी तिच्यासोबत जाऊन काही तास घालवला तर काय हरकत आहे? कारण जशी आज ती आणि मी एकेमेकीसमोर बसून मस्त गप्पा मारत खात पीत वेळ घालवला. तशी वेळ काही वर्षानंतर माझी पण येईलच कि...!!! फक्त समोरची व्यक्ती बदलली असेल... आणि म्हणतात ना कि कोणाचा वेळ हा पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळे आपण एखाद्याला दिलेला वेळ मग तो समक्ष भेटीत असो किंवा फोनवर बोलून असो यासारखी सुरेख भेट नाही..!!
©️स्वप्ना.
Add caption

Tuesday, 30 October 2018

हिमालयाचे वारकरी वसंत वसंत लिमये...

वसंत वसंत लिमये म्हटलं कि एक ठाणेकर, आयआयटीअन, एक लेखक आणि हाय प्लेस मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा हे समीकरण आहेच पण याचबरोबर अत्यंत दिलखुलास, बेधडक, उत्साही, सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते... कायम समोरील माणसाच्या मनात कुतूहल निर्माण कसं करायचं याचं गुपित समजलेले एक अभ्यासू लेखक म्हणजे वसंत वसंत लिमये...!!!

यांच्या भेटीचा तसं म्हणाल तर योग नोकरीत असताना फारसा आला नाही. पण त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा मात्र नक्कीच होती. अर्थात त्याचे कारण पण त्याच्याच “कॅम्पफायर” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हेच होते ..!!! पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाही असू शकतो याचा प्रत्यय मला तेंव्हा आला. आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली तर किती छान होईल असं वाटत होत.. हि सुप्त इच्छा तेव्हापासुनचीच...!!!

पण म्हणतात ना प्रत्त्येक गोष्टीची एक वेळ असते. माझं तसच झालं... फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं ठरवलं आणि एक दिवस त्यांची वेळ घेतली आणि माझ्या मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. माझं सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर त्यांनी माझ्यापासूनच तू या कामाला सुरुवात कर असं सांगितलं आणि माझ्या नवीन कामाचा श्रीगणेशा झाला. आता या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले. पण या एक वर्षात त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळालं. वक्तशीरपणा, मग तो काम पूर्ण करण्याच्या बाबतीत असो किंवा मिटींगसाठी असो, वेळोवेळी आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा देणे हे असो तो महत्वाचा... सर्वात महत्वाचे म्हणजे कल्पकता...!!! मल्टीटास्किंग कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकावं... कितीही कामाच्या व्यापात असले तरी एसएमएसला त्यांचे उत्तर हे येणारच...!!!

एकीकडे हे सर्व शिकत असताना “विश्वस्त” या पुस्तकाचे विविध कार्यक्रम चालू होते त्यासंबंधित कामे करत असताना एक दिवस अचानक “हिमयात्रा २०१८” या मोहिमेची माहिती त्यांनी मला दिली. त्यासाठीची लागणारी प्रचंड तयारी, मिनिटामिनिटाचे आखलेले वेळापत्रक, त्यासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव, त्यांच्याबरोबर प्रत्त्येक आठवड्यात बदलले जाणारे त्यांचे जे सहकारी होते, त्यांना कुठे, कसे, कधी भेटायचं हे वेळापत्रक, त्याची आखणी हे सर्व पाहून मी थक्क झाले. या २ महिन्याच्या मोहिमेत त्यांच्या “हिमयात्रा २०१८” या फेसबुक पेजवर वेळोवेळी त्यांच्या या मोहिमेचे अपडेट्स छायाचित्राच्या रुपात त्यांच्या चाहत्यांना देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी मला दिली. हे सर्व काम करताना मनात आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलू शकत आहोत याचे समाधान वाटत होते. त्यांची हि हिमयात्रा हि फक्त फिरण्याइतकीच मर्यादित राहणार नाही याचा अंदाज होताच आणि तो बरोबरच होता...!!! कारण, दोन महिन्याच्या मोहिमेनंतर असंख्य कल्पनांसहितच आमची मीटिंग झाली आणि “साद हिमालयाची” या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

“साद हिमालयाची” हा वसंत वसंत लिमये यांच्या “हिमयात्रा २०१८” या मोहिमेचा दृकश्राव्य अनुभव देणारा, तेथील अनुभव आणि वाचक, प्रेक्षक, चाहते मंडळींशी संवाद साधणारा अंदाजे २ तासाचा कार्यक्रम आहे. याचा पहिला कार्यक्रम २३ ऑगस्ट २०१८ रोजी अभ्यास गटा तर्फे ठाकूर धाम येथे झाला. छान गप्पा, प्रश्नोत्तरे झाली. सर्वजण हिमयात्रेत दंगून गेले. हळू हळू अशा कार्यक्रमाविषयी चौकशीचे फोन, ई-मेल, येऊ लागले. अर्थात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य निश्चितच आहे.

दुसरा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०१८ रोजी विष्णूकृपा सभागृहात सरांच्या रुपालीतील मित्रमंडळीनी आयोजित केला होता. यात पुढाकार हेमंत सोमण आणि वर्तक बंधू यांनी घेतला तर वर्षां चाफेकर वर्तक हिने छान मुलाखतवजा गप्पा मारल्या. तिसरा ठाण्यात होणारा कार्यक्रम लगेचच ४ दिवसांनी असल्यामुळे उत्कंठा होतीच.

तिसरा कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सहयोग मंदिर, ठाणे येथे झाला ज्यात वसंत वसंत लिमये आणि . डॉ .आनंद नाडकर्णी असे दोघेही होते. त्यांची मुलाखत मुलाखतकार:- शिरीष अत्रे यांनी घेतली. मुळचे ठाणेकर असल्याने या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉल पूर्ण प्रेक्षकांनी भरला होता. शिरीष अत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उत्तम पद्धतीने दिली. कार्यक्रमाची  रंगत वाढली ती सिक्कीम ते लडाख प्रवासाची क्षणचित्रे आणि त्याला अनुसरून निवेदन असलेल्या छोट्या फिल्मने. थोडक्यात ह्या दृकश्राव्यानुभवातून सर्वांना ‘सिक्कीम ते लडाख’ हा जणू प्रवासच घडला....!!!

चौथा कार्यक्रम १९ ऑक्टोबर २०१८ रोजी 'आदित्य रसिक वाचक गट' तर्फे 'आदित्य गार्डन सिटी' येथे झाला. या कार्यक्रमात वसंत वसंत लिमये सरांसोबत त्यांच्या हिमयात्रेत सहभागी झालेल्या मराठी सीरिअल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम सर्वांच्या लाडक्या “नानी” म्हणजेच सुहिता थत्ते देखील होत्या. त्यांच्यासोबत विश्वेश जिरगाळे यांनी मारलेल्या गप्पा चांगल्याच रंगल्या.

असा गप्पा, प्रश्नोत्तरे आणि ‘सिक्कीम ते लडाख’ ह्या प्रवासाचा अनुभव दृकश्राव्यातून देणारा वसंत वसंत लिमये सरांचा “साद हिमालयाची” हा कार्यक्रम विविध शहरात आणि देशांत होवो या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

Saturday, 4 August 2018

निमित्त "कच्चा लिंबू"चे

स्पेशल आईबाबा निमित्त "कच्चा लिंबू"

प्रत्त्येक आई वडिलांसाठी आपलं मुल हे स्पेशल असतं. त्याला वाढविताना एखादी गोष्ट आपल्याला कमी घेता आली तरी चालेल पण आपल्या मुलीला / मुलाला काही कमी पडणार नाही याची काळजी सर्वतोपरी ते घेत असतात. तसेच माझे हे स्पेशल आई बाबा..

पहिलं पाउल टाकण्यापासून, तसेच माझ्या नोकरीच्या काळात अडचणीच्या वेळी माझ्या मुलाला सांभाळण्यापासून ते अगदी आज हे माझे लहानपणाचे फोटो शेअर करण्यापर्यंत माझ्यासाठी  माझ्याबरोबर कायम असतात ते माझे आई बाबा..

दोघांनाही घरची आणि आर्थिक जबाबदारी असल्याने नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे काही वर्ष मला पाळणाघरात ठेवावं लागलं हि खंत कायम बोलून दाखवणारी आई.. जी मला पाळणाघरात सोडून जाताना अनेकदा स्वतःचे डोळे पुसत जायची आणि मला परत घेण्यासाठी संध्याकाळी साडेपाच हि वेळ काहीही करून गाठायची.. त्या काळात त्यांच्या परीने जितके लाड करता आले ते दोघांनीही केले.. आईने  त्याकाळातील वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे शिवून स्वेटर विणून सर्व हौस केली..

तसेच बाबा.. गाण्याची स्वतःला ऐकण्याची आवड, त्यात रेकॉर्ड जमवण्याचा छंद असल्याने लहानपणापासून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली त्यामुळेच गाण्याची आवड उत्पन्न झाली.आज जे काही गाण समजत ते तुमच्यामुळे.. नातेवाईकांबरोबर मैत्रिणी मित्र परिवार पण महत्वाचा असतो हे ते त्यांच्या अडचणीच्या काळात आलेले अनुभव सांगून कायम सांगायचे त्यामुळे नातेवाईकांइतकाच मोठा मित्रमैत्रिणी परिवार आजूबाजूला कायम असतो..

शेअरिंग मग तो खाऊ असो किंवा फटाके असो त्याने आनंद द्विगुणीतच होतो.. जग कसेही वागो आपण चांगलच वागावं, कायम हसमुख असणारे आणि कायम सकारात्मक विचार करणारे आणि नोकरीमधून निवृत्त झाल्यावर स्वतःकरता एकमेकांकरता आणि सर्वासाठी वेळ देणारे असे हे माझे स्पेशल आई बाबा.. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि तुमची साथ आणि आशीर्वाद अशीच ह्या पुढे आम्हाला लाभो हीच देवाकडे प्रार्थना..  !!
:) :)


#स्पेशलआईबाबा#KacchaLimbu

Friday, 20 July 2018

तुम्ही एखाद्याला किती वेळ देता, यापेक्षाही मिळालेल्या वेळेत काय देऊन जाता हे महत्वाच...

@ मी मनमुक्ता...

Thursday, 5 April 2018

तळमजला..

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते खरं आहे. आता जेंव्हा समवयीन बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा जुन्या आठवणींना अगदी सहजपणे उजाळा दिला जातोच.. अशीच एक आठवण – आठवण तळमजल्याची..!!
पूर्वी मोठमोठाले कॉम्प्लेक्सची संस्कृती नव्हती तरी त्यामानाने आम्ही जिथे राहायचो ती सोसायटी हि मोठीच म्हणायची. म्हणजे साधारण २५ बिऱ्हाडे होती. अंदाजे इयत्ता चौथी पर्यंत मी माझ्या आजीकडेच राहायला आणि सांभाळायला होते त्यामुळे सोसायटीमधील सर्वांशीच खूप संपर्क नसायचा. हा मात्र ठराविक घर अशी आहेत जिथे माझा मुक्काम नक्की असायचा. थोडक्यात सांगायचं तर पडिक असायचे मी.. ती घरं म्हणजे देसाई आणि टिकेकर काका काकू यांचे.. जणू काही तीदेखील माझीच घर आहेत अशा थाटात माझा वावर असायचा. आणि तो वावर इतका सहज असायचा कि त्यांच्याकडील येणारे पाहुणे पण विचारायचे कि तुमची मुलगी का?
गणपतीमध्ये देसाई काकूंकडे मला राहायचं असायच कारण त्यांच पाहुण्यांनी भरलेलं घर, गप्पा, एकत्र मिष्टान्न जेवण आणि त्यांचे पुतणी पुताण्यांबरोबर खेळ आणि गप्पा असा बेत मला कायम खुणावायचा. त्या काळात आई कटाक्षाने पढवून पाठवायची मला कि “आरती झाली, प्रसाद काकुनी दिला कि तडक घरी यायचं. जेवायला थांबायचं नाही.” पण नाही !! तसं कधीच व्हायचं नाही. काकूंनी आणि काकांनी सांगितलं कि त्यांच सांगण लगेच ऐकायचे आणि तडक शेजारी टिकेकर काकुच्या घरात जाऊन खिडकीतून आईला हाक मारायचे व ताट दाखवून ओरडायचे “आई आजच्या दिवसच जेवते ना !” हा संवाद अर्थात तळमजला आणि पहिला मजला असा चालायचा आणि पूर्ण सोसायटीला समजायचं कि मी आज देसाई काकूंकडे जेवणार आणि दुसरं म्हणजे “आजच्याच दिवस” हे गणपतीचे सातही दिवस असायचं कारण काकुकडे गौरी गणपती असायचे.

हि आठवण माझ्या एकटीची माझ्या पुरतीच फक्त माझीच..!! पण मग जसजसे मोठे होत गेलो सोसायटीमधील सर्व मित्रमंडळी चांगली परिचयाची झाली. हळूहळू शाळेतून घरी आल्यावर पोटात एकदाच काही ढकलून कधी खाली खेळायला जाऊ असं व्हायला लागलं..!! कारण रोज एक नवीन खेळ खेळायचं आकर्षण.. !! कारण प्रत्येक खेळाचा प्रमुख वेगळा असायचा..!! कधी बॅडमिंटन, आंधळी कोशिंबीर, चीनची भिंत, लगोरी, डबाइसपैस, खांब खांब खांबोळी, लंगडी, टीपी टीपी टीप टॉप, हे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. हे सर्व खेळत असताना आमच्या खेळण्याच्या वस्तू, रुमाल, चपला, रॅकेट्स, या वस्तू नीट ठेवण्यासाठी कायम आम्ही तळमजल्यावर राहणाऱ्या सर्वांनाच आणि मुख्यत्वे टिकेकर आणि देसाई काका काकूंना खूप त्रास द्यायचो. उन्हाळ्याच्या दिवसात तर इतके वेळा आम्ही पाणी पिण्यासाठी जायचो आणि ते पण अगदी आनंदाने गार पाणी कधी माठातील किंवा फ्रीजमधील प्यायला द्यायचे. हे करत असताना कधीच त्यांनी कंटाळा केला नाही. ऑफिसमधून दमून आलेले असले तरी कधी चिडले नाही. कधी कधी दोन्ही काकू आम्हाला खेळून दमला असाल म्हणून गोळी, चॉकलेट, बिस्कीट किंवा काही खाऊ हातावर ठेवायच्या. कधी कधी वेळेप्रसंगी ओरडायच्या पण ते देखील आमच्या चांगल्यासाठीच.. कारण खेळायला जाण्याची घाई असल्यामुळे उभ्याने पाणी पिऊन पाळायच असायचं.. मग काकूच वाक्य कानावर यायचं “अरे/ अग हळू आणि बसून पाणी प्या..!! नाहीतर पोटात दुखेल.” त्यावर “काही नाही दुखत..” असं म्हणून पळून जायचो. हे शाळा असो किंवा सुट्ट्या असो कायमच असायचं.
सुट्ट्यांमध्ये तर हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचा उपक्रम फक्त सुट्ट्यांमध्ये सकाळसाठी तळमजल्याची घर बदलायची... मग आम्ही लेले, सुबंध, कुलकर्णी परांजपे, सोपारकर यांना त्रास द्यायचो. या सर्वांनीच आमचे हे त्रास प्रेमाने सहन केलेच पण वेळेप्रसंगी कोणाला लाही लागलं, खुपलं तर औषध, मलमपट्टी देखील केली. यातूनच आमचं या सर्वांशीच एक वेगळच नात निर्माण झालं.

जसजसे मोठे झालो कॉलेज सुरु झाले मग हे सर्व खेळ बंद झाले पण कॉलेजमधून येता जाता काका काकुंना हॅलो म्हणून पुढे जायचो. मग खेळण्याचे साहित्य, रुमाल, चप्पल या वस्तूंची जागा घराच्या किल्ल्या/ चावी, वेळप्रसंगी काही निरोप यांनी घेतली. कॉलेजमधून किल्ली घ्यायला गेले कि पाणी प्यायला थांबायचे तेंव्हा घरचे कॉलेजच्या आणि इतर गप्पा व्हायच्या त्यात अर्धा तास कसा जायचा समजायचं नाही.. अशातच कधी वरच्या मजल्यावरची गोखले काकू छान उन्ह खात भाजी घेऊन येताना दिसायची, कोणी शाळेसाठी निघालेलं असायचं आणि अशातच परत तिथेच गप्पांचा अड्डा जमायचा.

या सर्वांना दिवाळीत सर्वात जास्त त्रास आम्ही दिला असेल. कारण सुट्टी लागली कि किल्ला करणे यासाठी पाण्याच्या बादलीपासून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतील त्या आम्ही मागायचो. आणि सर्वात कहर म्हणजे दिवाळीची पहाट.. पहिला अटमबॉम्ब कोण लावणार?? आम्ही म्हणायचो आम्ही लावणार पण तसं व्हायचाच नाही कारण इतक्या पहाटे उठायचोच नाही आणि बहुदा तो ‘सुशील कुलकर्णी’ किंवा ‘राहुल कुलकर्णी’च पहाटे ५ ला उठून लावायचे आणि मग आमची सुरुवात..!! जणू काही तो नियमच असावा सर्व प्रांजालीकारांना उठवण्याचा..!! तसच आमच्या मैत्रिणी आल्या नाही वेळेवर किंवा बाहेर जाण्यासाठी हाक मारायची झाली तर तीदेखील काकुच्या इथे उभी राहूनच जोरात हाक मारायची कारण तिथून हाक मारली कि आमचा आवाज घुमायचा.. त्याची आंम्हाला मजा वाटायची पण हे करताना, फटाके उडविताना त्यांना किती त्रास झाला असेल हा विचार तेंव्हा मनात कधीच आला नाही.. पण आता नक्कीच येतो. कारण कॉलेज संपल्यावर कोणाचे पुढचे शिक्षण, कोणाची नोकरी आणि मग लग्न होऊन एक एक जण मुख्यत्वे मुली सासरी गेल्या आणि काही दुसऱ्या नवीन मोठ्या जागेत राहायला गेले. माझंही फारस जाण आता होत नाही पण जेंव्हा जाते तेव्हा येता जाता खिडकीत टिकेकर काका काकू आहेत का हे पाहिलं जातं. असतील तर कधी खिडकीत उभे राहूनच गप्पा आणि चौकशी केली जाते. पण आता पूर्वीसारखा आमचा चहाचा अड्डा कधीतरीच जमतो.

हे सगळं एकीकडे घडत गेलं असलं तरी तळमजल्यावरची घर तशीच आहेत. त्यातील माणस काही आहेत, काही आता आपल्यात नाहीत, तर काही जागा सोडून गेले आणि तिथे नवीन बिऱ्हाडकरू आले. वेळेनुरूप संदर्भ बदलले. आता जेवढे तळमजल्यावर आमचे हक्काचे काका काकू आहेत त्यांचेही हात आणि डोळे थकले आहेत. हातात काठी, कंबरेला पट्टा आला आहे. हे सर्व जरी असलं तरी उत्साह मला लाजवेल असा आहे. कारण अजूनही “ये ग चहा प्यायला.. गप्पा मारायला असं म्हटलं जातच.!!” जे अजून तिथे आहेत त्यांना आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी नक्कीच आठवत असतील.. आत्ता हे लिहित असतानाच मी परत एकदा लहान झाले. मन भावूक झालं. यासाठी कि जगलेले हे क्षण परत येणार नाहीतच पण असे क्षण, हे खेळ, असा छान शेजार आपल्या मुलांना नक्कीच लाभणार नाही. आपण जरी हे क्षण जगलेले असलो आणि आपण जरी फेसबुक, व्होट्सअप, मोबाईल अशा अनेक माध्यमांमधून जोडले गेलो असलो तरी संवाद साधण्यासाठी वेळ सर्वांकडे आहेच असं नाही. आपली सोसायटी “प्रांजली” लवकरच कात टाकेल असे वारे वाहू लागले आहेत. म्हणजे तिथे आता मोठा १० - ११ मजल्याचा कॉम्प्लेक्स तयार होईल. जेंव्हा कोणतीही माध्यमे नसताना आपण एकमेकांना इतके जोडले गेलो होतो तेच आपण इतकी माध्यमे असताना देखील मनाने दूरच आहोत असं वाटत आणि हा टोलेजंग कॉम्प्लेक्स झाल्यावर आपल्यातील संवाद आणि आपल्याशी संवाद साधणारा तळमजला पण आपल्या प्रमाणेच बंदिस्त होईल कि काय असं वाटतय.
फेसबुकवरून फिलिंग हॅपी स्टेट्स टाकणारे किंवा चेक इन टू आणि लाईक करण्याच्या या जगात राहणारे आपण आपलं बालपण, तळमजला, तिथे राहणारी माणस यांना नुसत्या आठवणीतच नाही तर संवादातून जपूया.. फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी.. आपल्या आई बाबांसाठी.. आपल्या लाडक्या शेजार्यांसाठी.. !!
तुम्हाला काय वाटत.??

स्वप्ना..